मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) रेड अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले आहे.
सोशल मिडियाच्या माध्यमातून महत्त्वाचा संदेश
महापौर रितू तावडे यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत मुंबईकरांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. "मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाची आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे," असे त्यांनी म्हटले.
अनावश्यक बाहेर पडू नका
नागरिकांनी कोणतेही अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापौरांनी केले. तसेच झाडांजवळ उभे राहणे टाळावे आणि वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करावे, असेही त्यांनी सांगितले.
अफवांवर विश्वास ठेवू नका
सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पुढे पाठवू नयेत, असे आवाहन करत प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले.