Mumbai : सँडहर्स्ट रोड रेल्वे दुर्घटनेला जबाबदार कोण? ५ दिवस उलटले तरी FIR नाही  संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : सँडहर्स्ट रोड रेल्वे दुर्घटनेला जबाबदार कोण? ५ दिवस उलटले तरी FIR नाही

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे ट्रॅकवरून चालणे हे भारतीय रेल्वे कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे जीआरपी तपासात सावधगिरी बाळगत असून, निष्काळजीपणा किंवा मनुष्यवधासमान दोषारोप लावता येतील का, याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. तर, “कोणालाही ट्रॅकवर उतरायची इच्छा नव्हती, पण परिस्थिती तशी निर्माण झाली होती,” असं जखमींपैकी एकाच्या नातेवाइकाने स्पष्ट केलं आहे.

Krantee V. Kale

मुंबई : सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेला तब्बल पाच दिवस उलटून गेले तरीही शासकीय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) अद्याप या प्रकरणी गुन्हा नोंदवलेला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, अद्याप कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्याचा जबाब घेण्यात आलेला नाही.

‘वेट अँड वॉच’ मोड

‘फ्री प्रेस जर्नल’ने यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, जीआरपीने या प्रकरणी ‘वेट अँड वॉच’ भूमिका घेतली आहे. सर्व पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब तपासल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे जीआरपीकडून सांगण्यात आले आहे.

कसा झाला अपघात?

६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. परिणामी, घरी परतण्यासाठी काही प्रवासी रेल्वेरुळांवरून चालत जात होते. पण, अचानक लोकल सेवा सुरू झाली आणि मागून आलेल्या लोकलने काही प्रवाशांना उडवले. यामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.

का पुकारला अचानक संप?

मुंब्रा रेल्वे अपघातात (९ जून रोजी) पाच जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर एफआयआर दाखल केल्याच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांनी ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास अचानक आंदोलन केलं. सेंट्रल रेल्वे मजदूर संघटनेच्या सदस्यांनी सीएसएमटी येथे निदर्शनं केली आणि मोटरमॅनची लॉबी ब्लॉक केली होती, ज्यामुळे स्थानकावरील गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती.

जीआरपी घेतेय कायदेशीर सल्ला

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे ट्रॅकवरून चालणे हे भारतीय रेल्वे कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे जीआरपी तपासात सावधगिरी बाळगत असून, निष्काळजीपणा किंवा मनुष्यवधासमान दोषारोप लावता येतील का, याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे.

प्रवाशांचे म्हणणे : परिस्थितीमुळे ट्रॅकवर उतरावे लागले

दरम्यान, जखमी प्रवासी हफीझा चोगले यांच्या प्रकृतीत सुधारणा असून उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांचा व्हेंटिलेटरही काढण्यात आला आहे, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली. जखमींपैकी एकाच्या नातेवाइकाने सांगितले, “पोलिसांनी माझा आणि माझ्या भावाचा जबाब घेतला.” त्याने पुढे सांगितले की, संपामुळे लोकल गाड्या बराच काळ थांबल्या होत्या आणि त्यामुळे प्रवाशांना गाडीतून उतरून ट्रॅकवर चालावं लागलं. “कोणालाही ट्रॅकवर उतरायची इच्छा नव्हती, पण परिस्थिती तशी निर्माण झाली होती,” असं त्याने स्पष्ट केलं.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती