मुंबई : दहावी निकालामध्ये राज्यातील ६ हजार ६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये मुंबई विभागातील १ हजार ४६१ शाळांचा समावेश आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमधील सर्वाधिक ५९५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून यामध्ये पश्चिम उपनगरातील सर्वाधिक २५९ शाळांतील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ठाणे जिल्ह्यातील ४४२ शाळांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मुंबई विभागातील मुंबई शहर आणि उपनगरातील ५९५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये पश्चिम उपनगरातील २५९ शाळा, त्याखालोखाल मुंबई शहरातील १७६ आणि पूर्व उपनगरातील १६० शाळांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यातील शाळांनीही दहावी निकालात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील ४४२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये ठाणे व नवी मुंबई शहरातील सर्वाधिक १४३ शाळा आहेत.
त्याखालोखाल डोंबिवलीतील ९६ शाळा, भाईंदरमधील ६८ शाळा, बदलापूरमधील ४३ शाळा, मुरबाडमधील २८ शाळा, उल्हासनगर व भिंवडीमधून प्रत्येकी १८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर कल्याण तालुक्यातील १३ शाळांचा निकालही १०० टक्के लागला आहे.
रायगडच्या २४५ शाळांचा समावेश
रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील ६३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्याखालोखाल खालापूर ३६, महाड २८, कर्जत २३, रोहा व माणगावमधील प्रत्येकी १८ शाळा, पोलादपूरमधील १३ शाळा, उरण, अलिबाग व श्रीवर्धनमधील प्रत्येकी १० शाळा, त्यानंतर मुरुडमधील ९ आणि म्हसळा तालुक्यातील ७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
पालघरमधील १५२ शाळांची कामगिरी
पालघर जिल्ह्यातील नालासोपारामधील ९१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. या जिल्ह्यातील बोईसरमधील ३६ शाळा, डहाणूमधील १५ शाळा, जव्हारमधील १० शाळा, वाडामधील ८ शाळा, मोखाडा, विक्रमगड आणि तलासरीमधील प्रत्येकी ७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.