मुंबई : पावसाळ्यात नाले आणि नद्यांमधून समुद्रात वाहून जाणारा कचरा रोखण्यासाठी समुद्रात मिळणाऱ्या सर्व नाले व नद्यांच्या मुखाशी ‘ट्रॅश बूम’ उभारावेत आणि तेथे अडविण्यात आलेला कचरा उचलण्यासाठी वर्षभर २४ तास कार्यरत यंत्रणा उभारावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.
सध्या शहरातील काही ठिकाणी ‘ट्रॅश बूम’ची व्यवस्था करण्यात आली असली, तरी ती अपुरी असल्याचे साटम यांनी पत्रात नमूद केले आहे. पावसाळ्यात नाले व नद्यांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, तरंगणारा कचरा आणि इतर घनकचरा समुद्रात वाहून जातो. भरती-ओहोटीच्या वेळी हाच कचरा पुन्हा समुद्रकिनाऱ्यांवर येत असल्याने किनारे अस्वच्छ होत असून पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर समुद्रात मिळणाऱ्या प्रत्येक नाला व नदीच्या ठिकाणी ट्रॅश बूम उभारण्यात यावेत. तसेच या ट्रॅश बूमद्वारे आलेला कचरा उचलण्यासाठी वर्षभर, २४ तास कार्यरत राहील अशी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पर्यावरण संरक्षण, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने महापालिकेने या प्रस्तावाला प्राधान्याने मंजुरी देऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अशी विनंती साटम यांनी केली आहे.
कचरा समुद्रात जाण्यापूर्वीच गोळा होणार
मुंबईतील विविध भागांतून निघणाऱ्या नाल्यांमधील कचरा थेट समुद्रात जात असल्यामुळे किनारपट्टीवर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होते आणि सागरी जीवनालाही धोका पोहोचतो. हा समुद्रात जाणारा कचरा सुरुवातीलाच अडवण्यासाठी 'ट्रॅश बूम' ही यंत्रणा सर्व नाल्यांच्या मुखाशी बसवणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामुळे नाल्यातील तरंगणारा कचरा आणि प्लास्टिक समुद्रात जाण्यापूर्वीच एका ठिकाणी गोळा करणे शक्य होणार आहे, असे साटम यांनी पत्रात म्हटले आहे.