मुंबई

Mumbai Viral Video : विक्रोळीतील पादचारी पुलावर शाळकरी मुलींचा जीवघेणा प्रवास, महापालिकेच्या दुर्लक्षावर संताप

विक्रोळीतील बंद पादचारी पुलावरून शाळकरी मुली जीव धोक्यात घालून खाली उतरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यावरुन महापालिकेच्या निष्काळजीपणावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

किशोरी घायवट-उबाळे

विक्रोळीतील एका पादचारी पुलावरून शाळकरी मुली जीव धोक्यात घालून खाली उतरत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ गुरुवार (दि.११) पासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे महापालिकेने या पुलाकडे केलेले दुर्लक्ष आणि सार्वजनिक सुरक्षा यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे की, संबंधित पादचारी पूल लोखंडी पत्र्यांनी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात पुलाचा वापर अशक्य असल्याने शाळकरी मुलींना धोकादायक मार्ग निवडावा लागत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी पुलाच्या बाहेरच्या कठड्याला पकडून उतरताना दिसतेय. तिच्यामागे दुसरी मुलगीही त्याच मार्गाने येण्याच्या दिशेने आहे. तर खाली आणखी दोन मुली त्यांच्या जाण्याची वाट पाहत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, आजूबाजूला उभे असलेले अनेक नागरिक हे दृश्य पाहत असतानाही या कृत्याला कोणीही विरोध करत नाही.

हा व्हिडिओ 'विक्रोळीकर' (vikhrolikarr) या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमुळे पादचारी पुलाच्या दुरुस्तीला होणाऱ्या विलंबामुळे नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना, जीव धोक्यात घालावा लागत आहे. “एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी इतका मोठा धोका का घ्यावा लागतो?” असा थेट सवाल या पोस्टमधून करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (BMC) तीव्र टीका करत, "वेळेत दुरुस्ती न करणे आणि बंद पुलांभोवती सुरक्षित पर्यायी व्यवस्था न उभारणे या गोष्टी गंभीर निष्काळजीपणा आहे," असे म्हटले आहे. काहींनी असा इशाराही दिला आहे की, "अशी परिस्थिती कायम राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही."

“ही केवळ दुर्लक्षाची नाही, तर थेट जीवाशी खेळ करणारा निष्काळजीपणा आहे,” अशी प्रतिक्रिया या व्हिडिओवर नागरिकांनी व्यक्त केली आहे. पादचारी पुलासारख्या मूलभूत सुविधेच्या दुरुस्तीत होणारा विलंब आणि त्याचे परिणाम हा मुद्दा आता केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित न राहता प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.

NEET Paper Leak : ‘आरोपी बाहेर आल्यास पुरावे नष्ट होण्याची भीती’; खैरनारला ६ जूनपर्यंत कोठडी

Weather Update : 'नौतपा'चा ताप, उष्णतेची लाट; आणखी आठवडाभर राहणार उन्हाचा कहर

नोकऱ्या गेल्यामुळे अमेरिकेत थारा नाही; हजारो भारतीयांवर हद्दपारीचे संकट

गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात कारवाई करणार - प्रताप सरनाईक

'कॉकरोच'चे ९४ टक्के समर्थक भारतीयच - अभिजीत दिपके; 'झुरळां'ना अण्णा हजारेंचा पाठिंबा