मुंबई : गेल्या पाच ते सहा वर्षांत पाणीपट्टीत वाढ न केल्याने यंदा पाणीपट्टीत वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे वृत्त मंगळवारी दैनिक ‘नवशक्ति’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर बुधवारी मुंबईचे पाणी महागणार असल्याबाबतचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी याप्रकरणी निवेदन करण्याची मागणी केली. मात्र, सभागृहातील सदस्यांना निवेदनाची प्रत वाटप न केल्याचे सांगत महापौर रितू तावडे यांनी विरोधकांना बोलण्यास मज्जाव केला.
जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती, पाणी शुद्धीकरण यासाठी मुंबई महापालिकेच्या जल विभागाला कोट्यवधी रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ राखण्यासाठी दरवर्षी पाणीपट्टीत ८ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येतो. २०२० - २०२५ पर्यंत पाणीपट्टीत विविध कारणांमुळे वाढ करता आलेली नाही. त्यामुळे सन २०२६ - २७ या वर्षांत पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून पालिका आयुक्त यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
आयुक्तांच्या मंजुरीनंतर स्थायी समिती अध्यक्ष यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. याबाबतची बातमी मंगळवारी प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे पाणी महागणार याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवेदनाची प्रत सदस्यांना वाटप न केल्याचे कारण देत महापौरांनी बोलण्यास नकार दिला.