मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकार मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआरडीए) समुद्री मार्गांचा विकास करून जलटॅक्सी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.
या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे, असे राणे यांनी मंगळवारी वृत्तसंस्थेला सांगितले.
मुंबई मेट्रोची यशस्वी अंमलबजावणी आपण पाहिली आहे. त्याच धर्तीवर एमएमआर मध्ये जलटॅक्सी सेवा सुरू केली जाईल. आम्ही आधीच आठ ते नऊ मार्ग निश्चित केले आहेत. डीपीआर तयार असून आम्ही आंतरराष्ट्रीय सल्लागारांशी चर्चा करत आहोत, असे ते म्हणाले.
ही जलवाहने प्रदूषण कमी करतील आणि नागरिकांना परवडणाऱ्या दरात सेवा पुरवतील. या सेवांचे व्यवस्थापन महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डद्वारे केले जाईल, असे राणे यांनी स्पष्ट केले.
सरकार गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग आणि एलिफंटा बेटापर्यंत ३० आसनी इलेक्ट्रिक जलवाहने सुरू करणार
स्वीडनच्या कॅंडेला क्रूझ कंपनीकडून १५ जलवाहने खरेदी केली जात आहेत, त्यातील दोन ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात दाखल होणार आहेत
मुंबईच्या माझगावहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणपर्यंत ‘रो-रो’ सेवा सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे
सेवेसाठी रत्नागिरी, विजयदुर्ग आणि मालवण येथे जेटी उभारल्या जात आहेत.