मुंबई : ओशिवरा नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे, असा अहवाल ‘व्हीजेटीआय’ने दिला आहे. त्यामुळे जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल २० कोटी ५ लाख १८ हजार रुपये खर्च करणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) या विभागामार्फत महानगरपालिका हद्दीतील पुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी पश्चिम उपनगरांत सल्लागार म्हणून मे. एससीजी कन्सल्टिंग सर्व्हिसेस यांची नेमणूक करण्यात आली आहे. ‘मे. एससीजी कन्सल्टिंग सर्व्हिसेस’ यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेस दिलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालात वाहतूक पुलाचा स्लॅब हा धोकादायक असल्यामुळे वाहतूक पुलाचा स्लॅब तोडून पुनर्बांधणी करणे तसेच पुलाचे बिअरिंग बदलणे आवश्यक असल्याचे सुचविण्यात आले.
त्यानंतर हा पूल पश्चिम उपनगरात लिंक रोडला जोडणारा महत्त्वाचा वाहतूक पूल असल्याने व पुलाची धोकादायक स्थिती पाहता पुनश्चः स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाने घेतला. यासाठी प्रतिष्ठित संस्था ‘व्हीजेटीआय’ यांची नेमणूक करण्यात आली. ‘व्हीजेटीआय’च्या पुनःपरीक्षण अहवालानुसार सदर पुलाच्या सुपरस्ट्रक्चरचे पाडकाम करून पुनर्बांधणी व सबस्ट्रक्चरची मोठी संरचनात्मक दुरुस्ती करावी लागेल, असे प्रस्तावित करण्यात आले. त्यानुसार आता जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.