मुंबई

मालवणीत रामनवमीच्या मिरवणुकीचा मार्ग मोकळा : मिरवणूक रोखता येणार नाही, नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा

भाजप आमदारांनी मीरा रोड, मालवणी, गोवंडी, घाटकोपर अशा विविध ठिकाणी भडकाऊ विधाने करत धार्मिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. याचा लोकसभा निवडणूक काळात विपरीत परिणाम होऊ शकतो, धार्मिक दंगल भडकली जाऊ शकते.

Swapnil S

मुंबई : मालवणी भागात रामनवमीच्या दिवशी होणारी आणि परवानगी देण्यात आलेली कोणतीही सार्वजनिक रॅली रोखता येणार नाही, असे स्पष्ट करताना उच्च न्यायालयाने या रॅलीत कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्याने प्रक्षोभक भाषण केले अथवा नियमांचे उल्लंन केले, तर संबंधितांवर कारवाई करा, असे निर्देश न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने पोलिसांना दिले.

भाजप आमदारांनी मीरा रोड, मालवणी, गोवंडी, घाटकोपर अशा विविध ठिकाणी भडकाऊ विधाने करत धार्मिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. याचा लोकसभा निवडणूक काळात विपरीत परिणाम होऊ शकतो, धार्मिक दंगल भडकली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलिसांना तातडीने संबंधित आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या. अशी विनंती करणारी याचिका खार येथील शिक्षिका अफताब सिद्विकी व अन्य रहिवाशांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी मालाड मालवणी येथे राम नवमीच्या दिवशी मिरवणूक काढण्यास परवानगी दिली आहे. त्या मुळे जातीय दंगे उसळण्याची भीती नाकारता येत नाही, याकडे याचिककर्त्यांने न्यायालयाचे लक्ष वेधत मिरवणूक रोखण्याची विनंती केली. याची दखल खंडपीठाने घेतली. अशा प्रकारे मिरवणूक रोखता येणार नाही, गरज भासल्यास मिरवणुकीचा मार्ग बदलण्याची दृष्टीने विचार करावा, असे निर्देश दिले. तसेच प्रक्षोभक भाषणांमुळे कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्या. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असू देत त्याच्याविरोधात कारवाई करा, असे निर्देश पोलिसांना देत याचिकेची सुनावणी २३ एप्रिलपर्यंत तहकूब ठेवली.

मान्सूनने महाराष्ट्र घेतला कवेत; १४ जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’

दोडक्या बहिणींकडून वसुलीची प्रक्रिया सुरू

चुका केल्या, पण कारणे तांत्रिक; नार्वेकरांचा खुलासा

Mumbai : पहिल्याच पावसात पोलखोल! सखल भागात साचले पाणी; रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत; महापौरांच्या देखतच मुकादम पडला उघड्या मॅनहोलमध्ये

लग्न करायचे नव्हते तर सियाने तसे का सांगितले नाही? केतन अगरवालच्या वडिलांचा शोकसंतप्त सवाल