मुंबई : पवई तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी येत्या १ ऑक्टोबरपासून पूर्णपणे बंद करण्यात येईल, असा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे. पवई तलाव व परिसराच्या पुनर्विकासासाठी ‘एईकॉम एशिया कंपनी लिमिटेड’ या सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागाराला १ कोटी ८५ लाख रुपये मुंबई महापालिका मोजणार आहे.
सध्या पवई तलावात दररोज सुमारे १८ दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी मिसळत आहे. तलावात येणारे १८ सांडपाणी निचरा बिंदू (आऊटफॉल्स) अडवून हे पाणी वळविण्याचे काम सुरू असून ३० जूनपर्यंत ते पूर्ण होईल. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून पवई तलावात कोणतेही सांडपाणी जाणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
महापालिका अधिकारी, तसेच आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्याने सर्व आऊटफॉल्सची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले.
पवई तलावालगतच्या आदी शंकराचार्य मार्गावरील परिसराच्या सर्वांगीण पुनर्विकासासाठी ‘एईकॉम एशिया कंपनी लिमिटेड’ची नियुक्ती करण्यात येत असून, या कामात ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ आणि आयआयटी, मुंबई यांचे तांत्रिक मार्गदर्शन घेतले जाणार आहे. प्रकल्पाच्या देखरेखीसाठी स्वतंत्र समितीही स्थापन केली जाणार आहे.