Mumbai Metro 9: अखेर प्रतीक्षा संपली! दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ६ एप्रिलपासून होणार सुरू; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा 
मुंबई

Mumbai Metro 9: अखेर प्रतीक्षा संपली! दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ६ एप्रिलपासून होणार सुरू; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

मुंबईतील दहिसर ते मिरा-भाईंदर दरम्यानची मेट्रो लाईन ९ येत्या ६ एप्रिलपासून सुरू होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Mayuri Gawade

मुंबईच्या उत्तरेकडील उपनगरांतील प्रवाशांची दीर्घकाळाची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदर दरम्यान धावणारी मेट्रो लाईन ९ अखेर ६ एप्रिलपासून सुरू होणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा...

पीटीआयच्या वृत्तानुसार, पत्रकारांशी संवाद साधताना सरनाईक म्हणाले की, काही कारणांमुळे उद्घाटनास विलंब झाला. "सुरक्षा मान्यता मिळण्याची आम्ही वाट पाहत होतो, ती आता मिळाली आहे. त्यामुळे ६ एप्रिल रोजी या मार्गाचे उद्घाटन निश्चित करण्यात आले आहे," असे त्यांनी सांगितले.

ही सेवा सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची दीर्घकाळाची प्रतीक्षा संपणार असून, प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यशस्वी चाचणी पूर्ण

मेट्रो लाईन ९ च्या पहिल्या टप्प्याची २ एप्रिल रोजी काशीगाव ते दहिसर दरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली. यापूर्वी ३ एप्रिलला उद्घाटन होणार होते, मात्र ते पुढे ढकलण्यात आले होते.

सुरक्षा आणि तयारीचा आढावा

या महिन्याच्या सुरुवातीला एमएमआरडीएचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रकल्पस्थळी भेट देत सुरक्षा उपाययोजना आणि एकूण कार्यान्वयनाची तयारी तपासली. सर्व यंत्रणा सार्वजनिक वापरासाठी सज्ज असल्याची खात्री करण्यात आली.

मार्गाची माहिती

मेट्रो लाईन ९ चा पहिला टप्पा ४.५ किलोमीटर लांबीचा असून, दहिसर पूर्व ते काशीगाव दरम्यान धावणार आहे. या मार्गावर पांडुरंग वाडी आणि मिरागाव ही स्थानके असणार आहेत. हा मार्ग छोटा असला तरी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे, कारण यामुळे मेट्रो सेवा उत्तरेकडील भागांपर्यंत विस्तारली जाणार आहे.

अंधेरीपर्यंत अखंड कनेक्टिव्हिटी

दहिसर पूर्व येथे मेट्रो लाईन ७ शी जोडणी होणार असून, मिरा रोड आणि आसपासच्या भागातून अंधेरी पूर्वेतील गुंडवलीपर्यंत थेट प्रवास करता येणार आहे. तसेच मेट्रो लाईन २एशी इंटरचेंज उपलब्ध होणार असल्याने अंधेरी पश्चिम आणि शहरातील इतर भागांशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे.

प्रवाशांना दिलासा

मिरा-भाईंदर परिसरात गेल्या काही वर्षांत झपाट्याने शहरी विस्तार झाला आहे. मात्र, या भागातील नागरिकांचा मोठा भर अद्याप रस्ते वाहतुकीवर आहे. मेट्रो सेवेमुळे प्रवास जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार असून, मुख्य रस्त्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Nagpur : जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री क्लोरीन वायूची गळती; ४० हून अधिक जण रुग्णालयात दाखल, VIDEO

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण