मुंबई : न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींच्या १६८ कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई पोलिसांनी केली आहे.
बँकेतील घोटाळ्यातून मिळवलेल्या पैशांचा वापर करून या पाच आरोपींनी मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे या पाच आरोपींच्या १६८ कोटींच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १०७ अंतर्गत करण्यात आलेली मुंबईतील ही पहिलीच कारवाई आहे.
आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली.
जप्त करण्यात येत असलेल्या मालमत्तांमध्ये बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्या सात सदनिका, दुकान आणि बंगल्याचादेखील समावेश आहे. त्याशिवाय कपिल देडियाची एक सदनिका, उन्नहलथन अरुणाचलमचे दुकान, जावेद आझमचे बिहारमधील दुकान, सदनिका तसेच पाटणा येथील सदनिका यांचा समावेश आहे. न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळा प्रकरणातील आर्थिक गुन्हे शाखेने ८ आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींची मालमत्ता जप्त केली जाते.