पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा झपाट्याने प्रसार होत आहे. १८ ते २५ सप्टेंबर म्हणजेच एका आठवड्यात मलेरियाचे १७२, डेंग्यूचे ४१, लेप्टोचे नऊ, तर गॅस्ट्रोचे ८८ नवे रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या १५ दिवसांच्या तुलनेत ही संख्या दुपट्ट झाल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईत गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ ठाण मांडून बसलेला कोरोना आता जवळपास आटोक्यात आला आहे; मात्र पावसाळी आजार वाढत असल्याचे समोर आले आहे. १ ते १८ सप्टेंबरच्या तुलनेत १८ ते २५ सप्टेंबरपर्यंत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे.
दरम्यान, मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ देऊ नका. आपले घर, कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवा, तसेच ताप, सर्दी, खोकला असल्यास जवळील दवाखाना, हेल्थ पोस्ट व रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.