नैसर्गिक आपत्तीत तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त कुटुंबांना पाच हजार रुपये मदत करण्यात येत होती. त्यामध्ये तिपटीने वाढ करून पंधरा हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासारखेच शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
कोविडच्या निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या आणि पूर्णवेळ पार पडले आहे. ९ दिवसांमध्ये ६ दिवसाचे कामकाज झाले. माझ्या दृष्टीने हे अधिवेशन खूप यशस्वी ठरले व या अधिवेशनात सर्वसामान्यांच्या दृष्टीने आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुरवणी मागण्यांच्या विधेयकांसह महत्त्वपूर्ण अशी १० विधेयके या अधिवेशनात मंजूर करण्यात आली. हे महत्त्वाचे निर्णय व विधेयके अशी, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव नामकरण, तसेच नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण करण्याचा केंद्र शासनाला शिफारस करण्याचा विधान मंडळाचा ठराव यांचा समावेश आहे.
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक
राज्यात ‘एक दिवस बळीराजा’ ही संकल्पना राबवणे
पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास नुकसानभरपाई
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा
मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करणार
धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास नेणार
गिरणी कामगारांना ५० हजार सदनिका देणार
मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबाबत विशेष विकास नियंत्रण नियमावली
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी आवश्यकतेनुसार निधी
बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काचे घर
राज्यात सात हजार पोलिसांची भरती करणार
२९ हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे देणार
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार
कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स फी
रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी
पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी अडीचशे कोटी रुपये वर्ग
स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा केंद्राला मान्यतेसाठी पाठवला.