मुंबई : मुंबईतील ३९७ किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. मात्र गेल्या दीड ते दोन वर्षांत ९१० सिमेंट काँक्रिटच्या रस्तेकामापैकी फक्त १२३ कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे मुंबईतील रस्ते खड्डेमुक्तीला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना खड्डेमय प्रवास करावा लागणार आहे.
मुंबईतील रस्ते पुढील दोन वर्षांत खड्डेमुक्त होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये केली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने तातडीने सहा हजार कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या. निविदा प्रक्रियेत पात्र कंत्राटदारांना पालिकेने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची वर्कऑर्डर दिली. ३९७ किमी रस्तेकामांपैकी फक्त पूर्व व पश्चिम उपनगरातील सिमेंट काँक्रिटच्या रस्तेकामाला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या दीड ते दोन वर्षांपासून उपनगरातील कामे कासवगतीने सुरू आहेत. पूर्व व पश्चिम उपनगरातील आतापर्यंत फक्त २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर मुंबई शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे रस्तेकाम अद्याप सुरूच झालेले नाही. त्यामुळे ‘खड्डेमुक्त मुंबईतील रस्ते’ ही मुख्यमंत्र्यांची घोषणा कागदावरच राहिली आहे.
पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. एका महिन्यात रस्त्यांची कामे होणे अशक्य आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना पुन्हा रस्त्यातील खड्ड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या काही वर्षात रस्त्यात पडणारे खड्डे हा विषय पालिकेत आणि विधीमंडळात गाजला. सद्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अद्याप रस्ते कामे रखडली आहेत. त्यामुळे निवडणुकीत अपूर्ण रस्ते हा आयता विषय विरोधी पक्षांना मिळाला आहे.