मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (१८ मार्च) महाराष्ट्रासह गुजरात, बिहार, यूपी, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातील गृहसचिव आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. चहल यांच्या व्यतिरिक्त उपायुक्तांची देखील बदली करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज नवे निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि आयुक्त ज्ञानेश कुमार यांची बैठक झाली. यानंतर महाराष्ट्रासह ६ राज्याच्या गृहसचिव, आयुक्त आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले. यापूर्वी आयोगाने महाराष्ट्र सरकारला आयुक्त आणि उपायुक्त यांच्या कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांच्या बदल्या करण्यात याव्या, याबाबत पत्र पाठविले होते.
चहल हे १९९८ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएस अधिकारी आहेत. चहल यांनी २०२० मध्ये कोविड काळात मुंबईच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकराला होता. यानंतर चहल यांच्या कार्यकाळ संपल्यानंतरही तो वाढवण्यात आला होता. परंतु, आता आयोगाच्या आदेशानंतर चहल यांची बदली करण्यात आली आहे. चहल यांची कोणत्या विभागात बदली करण्यात आली हे अद्यापही कळाले नाही.
तसेच पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांची देखील बदली करण्यात आली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये कुमार यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणा चौकशीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शन देखील केली होती.