पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली तसेच सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. येत्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात आणखी पुढे सरकणार असून, लवकरच तो पुणे आणि मुंबई गाठण्याची शक्यता आहे. हर्णे, सोलापूर, कलबुर्गी, नंदयाल, चेन्नई, कैलाश शहर, लामडिंग आणि लखीमपूर अशी मान्सूनची रेषा आहे.
तळकोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात यामुळे पावसाचा परिणाम जास्त आहे, तर गोवा राज्यातही वादळी पाऊस होत आहे. कर्नाटक किनारपट्टीला पावसाने झोडपले असून राज्याच्या अंतर्गत भागातही पावसाची तीव्रता अधिक होती.
हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे ९ जून रोजी कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण कर्नाटक तसेच केरळात अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. हळूहळू पावसाचा जोर या भागात कमी होणार आहे.
महाराष्ट्रात पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे. त्यानंतर मात्र काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याने मान्सूनला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.