मुंबई : मुंबईतील वरळी परिसरात भाजपच्या मोर्चादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीमुळे एका संतापलेल्या महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना जाहीरपणे सुनावले. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आयोजित या मोर्चात १५ ते २० हजार महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दरम्यान, आपल्या मुलाला आणण्यासाठी निघालेली महिला वाहतूक कोंडीत अडकल्याने तिने मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जाऊन संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने दिलगिरी व्यक्त केली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी मान्य केले की वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास झाला. महिलेची भाषा अयोग्य असली तरी तिचा राग रास्त होता, असे सांगत त्यांनी या प्रकरणी महिलेवर कोणतीही कारवाई करू नये, असे पोलिसांना सांगितले. दरम्यान, महापौर रितू तावडे यांनीही या गैरसोयीबद्दल मुंबईकरांची माफी मागितली आहे.
आयोजकांवर गुन्हा दाखल
वरळी पोलिसांनी मोर्चाच्या आयोजकांविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे सेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी या महिलेच्या धाडसाचे कौतुक करत भाजपवर टीका केली आहे. सामान्य जनतेला वेठीस धरून भाजप राजकीय इव्हेंटबाजी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.