लखनऊ : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणानंतर देणगीची मोजदाद करणाऱ्या २३ कर्मचाऱ्यांनी सामूहिकरीत्या राजीनामे दिले आहेत. कामाचे वाढलेले तास, अतिरिक्त ताण व पुरेसा पगार नाही अशी कारणे त्यांनी दिली आहेत. आता तेथे केवळ १३ कर्मचारी बाकी राहिले आहेत.
अपहार प्रकरण उघड होण्यापूर्वी देणग्यांची मोजदाद दोन शिफ्टमध्ये केली जात असे. शिवाय, कामाची विभागणी केली जात असे. प्रत्येक कर्मचाऱ्याची ड्युटी जवळपास ६ तासांची होती, असे कर्मचारी सांगतात. या व्यवस्थेत बरेच बदल करण्यात आले आहेत. सगळे काम एकाच शिफ्टमध्ये केले जाऊ लागले आहे. त्यामुळे कामाचे तास ६ वरुन ९ तासांवर गेल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. कामाचा दबाव वाढला आहे. पण सुविधांमध्ये वाढ झालेली नाही, अशी कर्मचाऱ्यांची व्यथा आहे.
गुरुवारी संध्याकाळी ड्युटी संपताच कर्मचाऱ्यांनी सामूहिकपणे विरोध दर्शवला. यानंतर त्यांनी एसबीआयच्या तुलसी उद्यान शाखा आणि संबंधित सुरक्षा एजन्सी यांच्याकडे मागण्यांचे पत्र आणि राजीनामे दिले. मागण्यांवर कोणतेही सकारात्मक उत्तर न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. सामूहिक राजीनाम्यांचा परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसून आला.
जमिनीवर बसून काम
मंदिर ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे सुमारे ४० कर्मचाऱ्यांपैकी केवळ १५-२० कर्मचारीच नियमित कामावर हजर राहत होते. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर मंदिर प्रशासनाने सुरक्षेत आणि सतर्कतेत मोठी वाढ केली आहे. कर्मचाऱ्यांना आत जाण्यापूर्वी अनेकदा तपासणीला सामोरे जावे लागते. आत प्रवेश करताना अनवाणी असावे लागते आणि मंदिराच्या आवारात अनेक सुरक्षा तपासणी नाक्यांवरून जावे लागते. पूर्वी टेबल-खुर्चीवर बसून मोजणी केली जात होती, ती आता जमिनीवर बसून करावी लागत आहे.