राष्ट्रीय

गुजरातमध्ये विषारी दारूचे २९ बळी ; मुख्य आरोपीसह १४ जणांना अटक

गावातील लोक दारू पिण्यासाठी आले होते. तेथे लोकांना दारूऐवजी मिथेनॉल रसायन देण्यात आले. हे मिथेनॉल अहमदाबाद येथून आणले

वृत्तसंस्था

गुजरातमधील बोताड जिल्ह्यात विषारी दारूच्या सेवनामुळे आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सोमवारी या प्रकरणात १० जणांचा मृत्यू झाला. तर मंगळवारी उपचारादरम्यान आणखी १९ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्य आरोपीसह १४ जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरात एसआयटीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, सोमवारी बरवाला येथील रोजीड गावात एका दारूभट्टीवर ८ गावातील लोक दारू पिण्यासाठी आले होते. तेथे लोकांना दारूऐवजी मिथेनॉल रसायन देण्यात आले. हे मिथेनॉल अहमदाबाद येथून आणले होते.

विषारी दारू पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांवर स्मशानभूमीऐवजी एका मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. रोसिंद गावात सर्वाधिक ९ जणांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. रोसिंद व्यतिरिक्त शर्यत, चौकडी, धंधुका, नबोई, रानपरी, पोलारपूर, चौरगा येथे शोककळा पसरली आहे.

गुजरातमध्ये ६२ वर्षांपासून दारूबंदी

गुजरातमध्ये १९६० पासून दारूबंदी लागू आहे. २०१७ मध्ये गुजरात सरकारने दारूबंदीशी संबंधित कायदा अधिक कडक केला होता. याअंतर्गत जर कोणी अवैधरित्या दारू विकत असेल तर त्याला १० वर्षांचा कारावास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार