राजनांदगाव/ रायपूर : जैन धर्मगुरू आचार्य विद्यासागर महाराज यांनी रविवारी छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगढ येथील चंद्रगिरी तीर्थ येथे ‘सल्लेखना’ समाधीद्वारे अखेरचा श्वास घेतला.
आचार्य विद्यासागर महाराज यांनी पहाटे २.३५ वाजता चंद्रगिरी तीर्थ येथे 'सल्लेखना'द्वारे समाधी घेतली, असे तीर्थच्या निवेदनात म्हटले आहे. महाराज गेल्या सहा महिन्यांपासून डोंगरगड येथील तीर्थावर मुक्कामाला होते आणि गेले काही दिवस त्यांची तब्येत बिघडली होती. गेल्या तीन दिवसांपासून ते सल्लेखना, स्वेच्छेने आमरण उपोषण करण्याची धार्मिक प्रथा पाळत होते आणि त्यांनी अन्नग्रहण सोडले होते. सल्लेखना ही एक जैन धार्मिक प्रथा आहे ज्यामध्ये आध्यात्मिक शुद्धीसाठी स्वेच्छेने मृत्यूपर्यंत उपवास केला जातो, असे तीर्थच्या निवेदनात म्हटले आहे.
छत्तीसगड सरकारने रविवारी अर्धा दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. या वेळी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. आजच्या काळातील वर्धमान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध दिगंबर जैन संत परंपरेतील आचार्य विद्यासागर महाराज जी यांचे आज निधन झाले, असे मुख्यमंत्री कार्यालयाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.