नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय महामार्गावर २ मल्टी-लेन फ्री फ्लो टोल प्रणाली' आणि 'एआय आधारित महामार्ग व्यवस्थापन २०२६' अखेर पूर्णपणे अंमलात येणार असून त्यामुळे टोल नाक्यांवरील प्रतीक्षा पूर्णतः संपेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली. टोल चोरी थांबेल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त होईल, असेही ते म्हणाले.
यामध्ये नंबर प्लेट ओळख, उपग्रह तंत्रज्ञान आणि फास्टॅग यांच्या एकत्रित वापरातून टोल संकलन केले जाईल. परिणामी वाहनांना टोलवर थांबावे लागणार नाही. पूर्वी टोल भरण्यास ३ ते १० मिनिटे लागत. फास्टॅगमुळे हा वेळ ६० सेकंदांपर्यंत आला. मल्टी-लेन फ्री फ्लो टोलने वाहनांना कमाल ८० किमी प्रतितास वेगाने टोल पार करता येईल आणि कुणालाही थांबवले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
सरकारला फायदा काय
यामुळे ६,००० कोटी रुपयांचा सरकारी महसूल वाढणे अपेक्षित असून १,५०० कोटी रुपयांच्या इंधनाची बचत यामुळे होणार आहे.
"टोलवरील वेळ शून्य मिनिटांपर्यंत आणण्याचा आमचा उद्देश आहे. २०२६ पर्यंत हे काम १०० टक्के पूर्ण केले जाईल. केंद्राची जबाबदारी राष्ट्रीय महामार्गापुरती आहे. राज्य महामार्ग किंवा शहरातील रस्त्यांवरील समस्या अनेकदा सोशल मीडियावर राष्ट्रीय महामार्गाशी जोडल्या जातात, परंतु त्या केंद्राच्या अखत्यारित येत नाहीत, असेही ते म्हणाले.