नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप करत वातावरण तापवले असतानाच आता भाजपच्या आजी-माजी खासदारांमध्येच मतचोरीवरून जुंपली आहे. खासदार राजीव प्रताप रुडी मत चोरी करुन विजयी झाल्याचा आरोप त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार संजीव बालियान यांनी केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.
कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीत भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी संजीव बालियान यांचा पराभव केला. त्यात रुडी यांनी बालियान यांचा १०२ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे बालियान यांना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य मानल्या जाणाऱ्या अमित शहांचा पाठिंबा होता. त्यामुळे भाजपचे आजी-माजी खासदार त्यांना एकगठ्ठा मतदान करतील, असा अनेकांचा होरा होता. पण तरीही रुडी यांनी बालियान यांचा पराभव केला. गेल्या महिन्यात ही निवडणूक झाली. मात्र महिन्याभरानंतरही रुडी विरुद्ध बालियान संघर्ष थांबलेला नाही. त्यामुळे भाजपसाठी अडचण वाढली आहे.
कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीत मत चोरी झाल्याचा आरोप संजीव बालियान यांनी केला आहे. 'या निवडणुकीत आधी ६२९ मते पडल्याच सांगण्यात आले. त्यानंतर तासाभरात आणखी ४० मते पडली. कमीत कमी दोन माजी खासदार, काँग्रेसचे बृजेंद्र सिंह आणि बसपचे राजाराम यांनी अन्य कोणाला तरी मतदान केले. मतदार यादीत अनेक माजी खासदारांची नावे होती. त्यांच्या नावावर मतदान झाले की नाही, याची कल्पना नाही. त्यामुळे देशभरात एसआयआर व्हायला हवे ही माझी मागणी आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर आवाहन करतो,' असे बालियान म्हणाले. आजी-माजी खासदारांमध्ये सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे भाजपची गोची झाली आहे.
या निवडणुकीत राजीव प्रताप रुडी आणि संजीव बालियान या एकाच पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये थेट सामना झाला. संजीव बालियान भाजपचे अधिकृत उमेदवार होते. त्यांना महाशक्तीचा पाठिंबा होता. त्यामुळे राजीव प्रताप रुडी यांना विरोधकांनी साथ दिली.