पीटीआय
राष्ट्रीय

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; चकमकीत ३२ नक्षलवाद्यांना कंठस्नान; मोठा शस्त्रसाठा जप्त

देशातील नक्षलवाद आता अखेरच्या घटका मोजत असल्याचे विधान काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून सुरक्षा दलांनी छत्तीसगडच्या बस्तर परिमंडळात नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई करीत शुक्रवारी ३२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.

Swapnil S

दंतेवाडा : देशातील नक्षलवाद आता अखेरच्या घटका मोजत असल्याचे विधान काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून सुरक्षा दलांनी छत्तीसगडच्या बस्तर परिमंडळात नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई करीत शुक्रवारी ३२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.

नारायणपूर-दंतेवाडा आंतरजिल्हा सीमेवरील अभुजमाडमधील थुलथुली आणि नेंदूर गावांमधील जंगलात शुक्रवारी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झडली. जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दलाने नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली असताना ही चकमक उडाली. घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी ३२ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे तेथून एके-४७ रायफल आणि एसएलआर असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला.

सुरक्षा दले नक्षलवादी लपून बसलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत ३२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. चकमकीत सहभागी झालेले सर्व जवान सुरक्षित आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा तळही उद्ध्वस्त केला आहे.

नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील परिसरामध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करीत नक्षलवाद्यांचा बीमोड केला. सुरक्षा दलांनी मिळविलेले हे यश स्पृहणीय आहे. त्यांच्या धैर्याला आपण सलाम करतो. नक्षलवादाचा पूर्णपणे नि:पात होईपर्यंत दुहेरी इंजिन सरकार (केंद्र आणि राज्य) गप्प बसणार नाही. राज्यातून नक्षलवादाचा नायनाट करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साई यांनी 'एक्स'वर म्हटले आहे.

यावर्षी आतापर्यंत १८५ नक्षलवादी ठार

सुरक्षा दलांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईमुळे यावर्षी चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची एकूण संख्या आता १८५ वर पोहोचली आहे. सुरक्षा दलांनी १९ एप्रिल रोजी २९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. मार्च २०२६ पर्यंत भारताला डाव्यांच्या नक्षलवादापासून मुक्त करण्याचा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. नक्षलवाद्यांविरुद्ध कठोर आणि निर्दयी कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत शहा यांनी दिले होते. बस्तर परिमंडळात सात जिल्हे असून त्यामध्ये दंतेवाडा आणि नारायणपूर यांचा समावेश आहे.

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी