नवी दिल्ली: एकीकडे नीट पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता दुसरीकडे एनटीएकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट अर्थात (सीयूईटी-यूजी २०२६) या परीक्षेतील गोंधळ समोर आला आहे. परीक्षा सुरू असताना तांत्रिक बिघाड झाल्याने विद्याथ्यांना परीक्षेसाठी तब्बल दोन तास उशीर झाल्याचे समोर आले आहे.
देशभरातील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी 'सीयूईटी-यूजी केंद्रांवर २०२६' परीक्षा शनिवारी काही विलंबाने तांत्रिक बिघाडामुळे सुरू झाली, अशी माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) दिली आहे. दरम्यान, हा तांत्रिक बिघाड आता दूर करण्यात आला असून उमेदवारांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून त्यांना परीक्षेसाठी पूर्ण भरपाई वेळ दिली जात असल्याचे 'एनटीए'ने स्पष्ट केले आहे.
तांत्रिक बिघाडामुळे एनटीएने दुपारच्या सत्राच्या वेळेत बदल केला आहे. सुधारित वेळेनुसार, विद्यार्थ्यांना दुपारी २:३० वाजल्यापासून केंद्रावर प्रवेश दिला जाईल आणि दुपारी ३:०० ऐवजी ४:०० वाजता परीक्षा सुरू होईल. तसेच, सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना पेपरची पूर्ण वेळ दिली जात असून, परीक्षा संपल्यानंतरच त्यांना केंद्राबाहेर सोडले जात आहे, असेही एनटीएने सांगितले.
एकही परीक्षा नीट घेता येत नाही - राहुल गांधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शिक्षण व्यवस्था 'पूर्णपणे उद्ध्वस्त' केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. सरकारला देशात एकही परीक्षा सुरळीत आणि प्रामाणिकपणे पार पाडता येत नाही, अशी टीका करत त्यांनी पंतप्रधानांच्या 'विश्वगुरू' असण्याच्या दाव्यावर जोरदार निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी 'एक्स'वर हिंदीतून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, नीट, सीबीएसई, एसएससी आणि आणि आज सीयूईटी... चार परीक्षा, एक कोटी विद्यार्थी. परंतु, यातील एकही परीक्षा प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने घेतली जाऊ शकली नाही. ज्या पिढीचे भविष्य तुम्ही बरबाद करत आहात, तीच पिढी उद्या तुम्हाला जाब विचारेल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.