मुंबई : भारतातील पहिल्या 'पूर्णतः डिजिटल' जनगणनेच्या प्रक्रियेला आजपासून (शुक्रवार) महाराष्ट्रात सुरुवात होत आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणून नागरिकांना 'स्व-नोंदणी' करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी आणि जनगणना संचलनालय संचालिका निरुपमा डांगे यांनी सांगितले की, ही प्रक्रिया डिजिटल गव्हर्नन्सकडे जाणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे. रिअल-टाइम डेटा संकलन आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी खास मोबाईल अॅप्लिकेशन्स आणि ऑनलाइन पोर्टलचा वापर केला जात आहे. स्व-नोंदणीसाठी केवळ या अधिकृत https://e.census.gov.in संकेतस्थळाचाच वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या एसएमएसमध्ये "RGICEN" हा कीवर्ड नसेल, अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या जनगणनेसाठी राज्य सरकारने १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी जिल्हा, तालुका, शहरे आणि गावांच्या सीमा गोठवल्या आहेत. याबाबतची अधिसूचना १५ जुलै २०२५ रोजीच जारी करण्यात आली होती.
११ अंकी क्रमांक महत्वाचा
१ मे ते १५ मे : नागरिकांसाठी ऑनलाइन स्व-नोंदणीचा कालावधी.
१६ मे ते १४ जून : घरांची यादी तयार करणे आणि गृह-जनगणना. या काळात प्रगणक दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ८ ते १० घरांना भेटी देतील.
ऑनलाइन नोंदणी पूर्ण केल्यानंतर नागरिकांना ११ अंकी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख क्रमांक मिळेल, ज्याची सुरुवात 'H' या अक्षराने होईल. हा क्रमांक जपून ठेवणे आवश्यक असून, प्रत्यक्ष भेटीसाठी येणाऱ्या प्रगणकांना हा क्रमांक दाखवणे अनिवार्य असेल.