नवी दिल्ली : चक्रीवादळाची सूचना देणारी सतर्कता यंत्रणा शास्त्रज्ञांनी विकसित केली. त्यामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणावर कमी झाली. आता शास्त्रज्ञांनी भूकंप सतर्कता यंत्रणा तयार करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
भारतीय हवामान खात्याच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते.
ते म्हणाले की, आधुनिक हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी यंत्रणा विकसित झाल्याने चक्रीवादळामुळे होणारे नुकसान कमी झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. त्यातून आर्थिक विकासाला चालना मिळाली.
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ‘मिशन मौसम’चे अनावरण करण्यात आले. यात हवामानावर लक्ष ठेवणारे तंत्रज्ञान, यंत्रणा, नवीन पिढीचे रडार्स, उपग्रह, उच्च क्षमतेचे संगणक आदींचा त्यात समावेश आहे. यावेळी मोदी यांच्या हस्ते भारतीय हवामान खात्याचा ‘आयएमडी-२०४७’चा आराखडा, वातावरण बदल आदींचे प्रकाशन करण्यात आले. तसेच टपाल तिकीट व १५० व्या वर्षानिमित्त नाणे प्रकाशित करण्यात आले.
पंतप्रधान म्हणाले की, हवामानशास्त्राने आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नैसर्गिक आपत्तीत कमीत कमी हानी व्हावी यासाठी हवामानशास्त्र अधिक कार्यरत राहणे आवश्यक असते. १९९८ मध्ये कांडला येथे झालेले चक्रीवादळ व १९९९ मध्ये ओदिशातील चक्रीवादळात हजारो लोकांचे बळी गेले होते. आता हवामान खात्यातर्फे हवामानाचे अंदाज अचूक वर्तवले जात आहेत. त्यामुळे बळींची संख्या कमी झाली आहे, असे मोदी यांनी सांगितले.
भारताच्या पूर मार्गदर्शक यंत्रणेमार्फत नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंकेला माहिती पुरवली जाईल. तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी काम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
प्राचीन काळी भारत प्रगत होता!
भारतातील प्राचीन शिल्पे व प्राचीन कागदपत्रातून हवामानाच्या विविध पॅटर्नची आणि प्राचीन काळी भारत किती प्रगत होता याची माहिती मिळते, असे मोदी म्हणाले. भारताचे प्राचीन ज्ञान हे कागदपत्रांमध्ये आहे. वेद, संहिता, सूर्य सिद्धांत, तमिळनाडूचे संगम साहित्य, घाग भड्डारी आदींमध्ये याबाबत सखोल अभ्यास केलेला आहे. पराशर ऋषी व बृहत संहितेमध्ये ढगांची निर्मिती कशी होते. ग्रहांची स्थिती याबाबत गणिती अभ्यास करण्यात आला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.