नवी दिल्ली : इंधन दरवाढ, पर्यावरणपूरक वाहनांबाबत वाढती जागरूकता आणि ग्रामीण भागातील मागणी यामुळे भारतातील वाहन विक्रीने मे २०२६ मध्ये नवा उच्चांक गाठला आहे. मे महिन्यात देशात एकूण २५.३१ लाख वाहनांची किरकोळ विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.५५ टक्क्यांनी अधिक आहे, अशी आकडेवारी वाहन विक्रेता संघटना फेडरेशन ऑफ ॲटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA-फाडा) ने जाहीर केली.
आकडेवारीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) बाजारातील वाटा प्रथमच ११ टक्क्यांच्या पुढे गेली. पश्चिम आशियातील तणावामुळे मे महिन्यात इंधनाच्या किमती वाढल्यानंतर ग्राहकांचा कल इंधन-बचत करणाऱ्या आणि पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांकडे वळल्याचे ‘फाडा’ने नमूद केले आहे.
दुचाकी क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा एका वर्षात ६.११ टक्क्यांवरून ९.२५ टक्क्यांपर्यंत वाढला. इंधन खर्च कमी करण्यासाठी ग्राहकांकडून ईव्हींबाबत चौकशी वाढल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले.
प्रवासी वाहन विक्रीत मोठी झेप : मे २०२६ मध्ये प्रवासी वाहनांची विक्री ४,०२,५९१ युनिट्सवर पोहोचली. गेल्या वर्षी याच महिन्यात ती ३,२६,६५६ युनिट्स होती.
दुचाकी विक्रीचाही विक्रम : मे महिन्यात १८.४४ लाख दुचाकी विकल्या गेल्या, तर एक वर्षापूर्वी हा आकडा १७.१५ लाख होता.
जून आणि पुढील तिमाहीसाठी विक्रेत्यांचा दृष्टिकोन सावध, आशावादी
जून २०२६ साठी वाहन विक्रेत्यांचा दृष्टिकोन सावध असला तरी आशावादी आहे. सुमारे ५०.५ टक्के विक्रेत्यांना विक्री वाढण्याची अपेक्षा आहे, तर ३९.९ टक्के विक्रेत्यांना बाजार स्थिर राहील, असे वाटते. केवळ ९.६ टक्के विक्रेते विक्री घटण्याची शक्यता व्यक्त करतात. दक्षिण-पश्चिम मान्सूनची प्रगती, खरीप हंगामाची तयारी आणि लग्नसराईचा उर्वरित काळ यामुळे मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. विशेषतः ईव्ही आणि नव्या मॉडेल्समुळे प्रवासी वाहन क्षेत्राला बळ मिळू शकते. फाडाच्या मते, पुढील तीन महिने वाहन उद्योगासाठी सकारात्मक राहण्याची शक्यता आहे.