दिसपूर : आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असतानाच, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गोमांस (बीफ) सेवनाबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. लोकांनी काय खावे यावर माझा आक्षेप नाही, परंतु गोमांस सेवन हे सार्वजनिक ठिकाणी न होता घराच्या चार भिंतींच्या आत व्हावे, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी सरमा यांनी घेतलेली ही भूमिका त्यांच्या आधीच्या कठोर भूमिकेपेक्षा मऊ मानली जात आहे. सरमा म्हणाले की, आसाममध्ये मोठा मुस्लिम समाज आहे जो गोमांस सेवन करतो. मी त्यांना थांबवत नाही. माझे म्हणणे फक्त इतकेच आहे की, ते तुमच्या घरात बसून खा. सार्वजनिक ठिकाणी त्याचे प्रदर्शन करू नका. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, गोमांस सेवन हे केवळ घरापुरते मर्यादित असावे आणि कोणत्याही मंदिराच्या पाच किलोमीटरच्या परिघात किंवा सार्वजनिक ठिकाणी ते खाण्यास मनाई असेल.
विरोधकांचा हल्लाबोल
काही दिवसांपूर्वी जोरहाट येथील प्रचारात सरमा यांनी सार्वजनिक ठिकाणी गोमांस खाणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याची आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. आता निवडणुकीच्या अगदी तोंडावर त्यांनी घेतलेल्या सावध भूमिकेमुळे विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप हटवा, गौमाता वाचवा, अशा शब्दांत सपाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणावर टीका केली.
कायदा काय
आसाममध्ये २०२१ मध्ये 'आसाम गोवंश संरक्षण कायदा' लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार मंदिरांच्या ५ किमी परिघात गोमांस विक्री आणि सेवनावर बंदी आहे. हिंदू, शीख आणि जैन धर्मीय बहुल असलेल्या भागातही यावर निर्बंध आहेत. गुरांची अवैध वाहतूक आणि कत्तल रोखण्यासाठी कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
उद्या होणाऱ्या मतदानापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा मतदारांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.