नवी दिल्ली : लोकसभेत बुधवारी ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल, २०२५’ मंजूर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ‘पश्चिम बंगालमधून बांगलादेशी व रोहिंग्यांची भारतात घुसखोरी होत आहे. भारतात जे लोक अशांतता पसरवण्यासाठी येतात. त्यांच्यावर आता ठोस कारवाई केली जाईल, कारण भारत ही धर्मशाळा नाही’.
लोकसभेत ‘इमिग्रेशन’ विधेयकावर झालेल्या चर्चेत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या ३० खासदारांनी भाग घेतला. यावेळी बोलताना शहा म्हणाले की, भारताच्या व्यवस्थेत योगदान देणाऱ्या व व्यापार व शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे. पण, भारतात अशांतता पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
ज्या लोकांचे उद्देश चांगले नाहीत, त्यांना रोखण्यात येईल. भारत ही धर्मशाळा नाही. भारतात येणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरिकांची माहिती आता नोंदवली जाईल. ते कोणत्या रस्त्याने येतात? कुठे थांबतात? ते काय करतात याची माहिती घेतली जाईल.
कुंपणासाठी पश्चिम बंगाल सरकार जमीन देत नाही!
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पश्चिम बंगालमधून बांगलादेश व रोहिंग्यांची घुसखोरी होत आहे. ४५० किमीची सीमा पश्चिम बंगाल सरकारमुळे खुली आहे. घुसखोर तिथून घुसखोरी करतात. भारताचे नागरिक बनतात. आधार कार्ड बनवून देशात पसरतात. जितके घुसखोर पकडले आहेत. त्यांच्याकडे २४ परगणा येथील आधार कार्ड मिळाली आहेत. प. बंगालमध्ये जेथे कुंपण घालायला जातो, तेथे सत्ताधारी पक्षाचे लोक येऊन गोंधळ घालतात. धार्मिक घोषणाबाजी करतात. त्यामुळे हे कुंपण घालणे थांबले आहे, ते केवळ बंगाल सरकारमुळेच, असा आरोप शहा यांनी केला.
अवैध प्रवाशांवर अशी होणार कारवाई
पासपोर्टशिवाय भारतात येणाऱ्यांना ५ लाख रुपये दंड,
५ वर्षे तुरुंगवास.
चुकीची माहिती देणाऱ्यांना ३ लाख दंड, ३ वर्षे शिक्षा.
विनापासपोर्ट आलेल्यांना तत्काळ ताब्यात घेतले जाईल.
राष्ट्रीय सुरक्षेचे प्रकरण असल्यास कठोर कारवाई.