आगामी काही महिन्यांत विमान प्रवासाचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील प्रमुख चार विमानतळांवर धावपट्टी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून त्यामुळे उड्डाण सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जोधपूर, श्रीनगर, पुणे आणि आदमपूर या विमानतळांवर तात्पुरती बंदी लागू होणार असल्याने अनेक फ्लाइट्स रद्द किंवा वेळापत्रकात बदल होऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या फ्लाइटची माहिती तपासूनच पुढील योजना करणे आवश्यक ठरणार आहे.
जोधपूर विमानतळ सर्वप्रथम बंद
या प्रक्रियेची सुरुवात जोधपूर विमानतळापासून होणार आहे. २९ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे. इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांसारख्या विमान कंपन्यांनी २८ मार्चनंतरच्या फ्लाइट बुकिंग्सही थांबवल्या आहेत.
श्रीनगरमध्ये टप्प्याटप्प्याने बंदी
श्रीनगर विमानतळावर टप्प्याटप्प्याने बंदी लागू होणार आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान आठवड्याच्या शेवटी विमानतळ बंद राहील. त्यानंतर १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता आहे.
पुणे आणि आदमपूर विमानतळही बंद
पुणे विमानतळावरही धावपट्टी दुरुस्तीचे काम होणार आहे, मात्र याचे अचूक वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.
दरम्यान, पंजाबमधील आदमपूर एअरबेस सुमारे ८ महिन्यांसाठी बंद राहू शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
दुरुस्ती का आवश्यक?
हे सर्व विमानतळ भारतीय हवाई दल (IAF) आणि नागरी उड्डाणांसाठी संयुक्तपणे वापरले जातात. त्यामुळे धावपट्ट्या लढाऊ विमानांसाठी योग्य राहाव्यात यासाठी नियमित देखभाल आणि दुरुस्ती आवश्यक असते. विशेषतः सीमावर्ती भागातील विमानतळांसाठी ही प्रक्रिया अधिक महत्त्वाची मानली जाते.
प्रवाशांवर काय परिणाम होणार?
या बंदीमुळे प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. फ्लाइट्स कमी होणे, मार्ग बदलणे (Rerouting) आणि उड्डाणे उशिरा होणे अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळेआधीच प्रवासाची योजना तपासून घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे.