राष्ट्रीय

सायबर गुन्ह्यांमध्ये भारत दहाव्या स्थानी; 'वर्ल्ड सायबर क्राइम इंडेक्स' जाहीर

सायबर क्राइम तज्ज्ञांनी 'वर्ल्ड सायबर क्राइम इंडेक्स' जाहीर केला असून, त्यात १०० देशांचा समावेश आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत भारत दहाव्या क्रमांकावर आहे. रशिया पहिल्या, तर युक्रेन दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका चौथ्या स्थानावर आहे. जगभरातील सायबर क्राइम तज्ज्ञांच्या एका नव्या संशोधनानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे.

सायबर क्राइम तज्ज्ञांनी 'वर्ल्ड सायबर क्राइम इंडेक्स' जाहीर केला असून, त्यात १०० देशांचा समावेश आहे. या अहवालात, रॅन्समवेअर, क्रेडिट कार्ड चोरी आणि फसवणूक यासह सायबर गुन्ह्यांच्या विविध श्रेणींनुसार मुख्य हॉटस्पॉट ओळखले गेले. यामध्ये ॲडव्हान्स फी भरण्याशी संबंधित फसवणूक हा सर्वात सामान्य गुन्हा असल्याचे सांगण्यात आले. ऑनलाईन ब्लॅकमेलिंग किंवा अनधिकृतपणे पैसे हस्तांतरित करणे यासारख्या नेटवर्क आणि संगणकांद्वारे केलेल्या बेकायदेशीर कृत्यांना सायबर गुन्हे म्हणतात.

सायबर गुन्ह्यांवर आधारित गुण

'वर्ल्ड सायबर क्राइम इंडेक्स'मध्ये सायबर गुन्ह्यांच्या आधारे गुण देण्यात आले आहेत. मात्र, प्रकरणांची संख्या यामध्ये दिलेली नाही. रशियाचा जागतिक सायबर क्राइम इंडेक्स स्कोअर १०० पैकी ५८.३९ असून, युक्रेनचा ३६.४४ आणि चीनचा २७.८६ आहे. भारताचा स्कोअर ६.१३ आहे.

निर्देशांकासाठी जागतिक सर्वेक्षण

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील तज्ज्ञांनी सायबर गुन्ह्याचा जागतिक अभ्यास केला. या आधारे हा निर्देशांक तयार करण्यात आला असून, हा अभ्यास पाच मुख्य सायबर गुन्ह्यांवर केंद्रित आहे. या तज्ज्ञांनी प्रत्येक सायबर क्राइम श्रेणीचे प्राथमिक स्रोत मानलेले देश ओळखले. याशिवाय, त्यांनी सायबर क्राइम ॲक्टिव्हिटीजच्या प्रभावावर आधारित प्रत्येक देशाची क्रमवारी लावली व ही यादी तयार करण्यात आली आहे.

Mumbai : वीकेंडला ट्रेनने प्रवास करताय? आधीच जाणून घ्या वेळापत्रक; उद्या 'या' मार्गावर २१ तासांचा मेगाब्लॉक

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; फ्लाइट्स कधी आणि कोणत्या मार्गांवर सुरू होणार? जाणून घ्या सविस्तर

IPLची रणधुमाळी सुरू! बंगळुरू-हैदराबाद लढतीने आजपासून १९व्या पर्वाला शानदार प्रारंभ

नवी मुंबईतून आता थेट श्रीनगर, गोवा, तिरुपती; उद्यापासून विमानसेवांचा विस्तार, तब्बल ४६ शहरांसाठी थेट सेवा

केंद्र सरकार ८.२० लाख कोटी कर्ज घेणार; महसुली तूट भरून काढण्यासाठी निर्णय