भारतीय जहाजांसाठी १२,९८० कोटींचे विमा संरक्षण; मॅरिटाइम फंडला केंद्र सरकारची मंजुरी 
राष्ट्रीय

भारतीय जहाजांसाठी १२,९८० कोटींचे विमा संरक्षण; मॅरिटाइम फंडला केंद्र सरकारची मंजुरी

केंद्र सरकारने भारत मॅरिटाइम फंडला मंजुरी देत भारतीय जहाजांसाठी १२,९८० कोटी रुपयांचे विमा संरक्षण जाहीर केले. यामुळे जागतिक तणावात सागरी व्यापाराला मोठा दिलासा मिळाला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

जागतिक स्तरावर वाढत्या तणाव आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या सागरी व्यापाराला संरक्षण देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत मॅरिटाइम फंड Bharat Maritime Fund) स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, यामधून १२,९८० कोटी रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.

भारतीय जहाजांना स्वस्त विमा मिळणार

या निधीमुळे भारतीय ध्वज असलेल्या तसेच भारतात येणाऱ्या आणि येथून निघणाऱ्या जहाजांना परवडणाऱ्या दरात विमा संरक्षण मिळणार आहे. धोकादायक सागरी मार्गांवरही हा विमा लागू होणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

देशांतर्गत कौशल्यविकासालाही चालना

या उपक्रमामुळे सागरी विमा क्षेत्रात जोखीम मूल्यांकन (Underwriting), दावे हाताळणी (Claim) आणि कायदेशीर प्रक्रियांमध्ये देशांतर्गत कौशल्य वाढणार आहे. तसेच भारतीय जहाज वाहतुकीच्या गरजेनुसार विमा सेवा विकसित करण्याचा उद्देश आहे.

प्रमुख सागरी संवेदनशील भागांचा समावेश

या विमा योजनेत जहाजांचे सांगाडे आणि यंत्रणा (Hull & Machinery), मालवाहतूक, प्रोटेक्शन अँड इंडेम्निटी (Protection & Indemnity – P&I) आणि युद्ध जोखीम यांचा समावेश असेल. सदस्य विमा कंपन्यांकडून सुमारे ९५० कोटी रुपयांच्या संयुक्त जोखीम वहन क्षमतेवर (Underwriting Capacity) पॉलिसी जारी केल्या जातील.

जागतिक तणावात भारतीय जहाजे सावध

दरम्यान, मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संबंधित अनेक जहाजांना अनिश्चिततेचा सामना करावा लागला. दुबईजवळील पाण्यातून 'सनमार हेराल्ड', 'देश गरिमा', 'देश वैभव' आणि 'देश विभोर' ही जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीकडे जात असताना काहींनी मार्ग बदलला किंवा थांबले.

होर्मुझ सामुद्रधुनीवरील अनिश्चितता कायम

इस्त्रायल-लेबनॉन दरम्यान झालेल्या १० दिवसांच्या युद्धविरामानंतर होर्मुझ सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी पुन्हा खुली करण्यात आली. मात्र, इराणकडून अजूनही परवानगी आवश्यक असल्याच्या सूचना मिळाल्याने जहाजमालक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ऊर्जा बाजारावर परिणाम

या सामुद्रधुनीतून लाखो बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते. त्यामुळे येथील परिस्थिती स्थिर राहिल्यास जागतिक ऊर्जा बाजारावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारत मॅरिटाइम फंड म्हणजे काय?

भारत मॅरिटाइम फंड म्हणजे सरकारकडून दिला जाणारा निधी, जो समुद्री व्यापार आणि जहाजांसाठी विमा संरक्षण देण्यासाठी वापरला जातो.

भारत मॅरिटाइम फंडमुळे नेमके काय होते?

  • जहाजांना विमा संरक्षण (Insurance Cover) देतो.

  • धोकादायक सागरी मार्गांवरही जहाजांना सुरक्षा मिळते.

  • विमा स्वस्त आणि सहज उपलब्ध करून देतो.

  • युद्ध, अपघात, नुकसान यांसारख्या धोक्यांपासून संरक्षण.

भारत मॅरिटाइम फंड महत्त्वाचा का आहे?

  • भारतीय जहाज कंपन्यांचा खर्च कमी होतो.

  • जागतिक तणावातही व्यापार सुरू ठेवता येतो.

  • भारताचा समुद्री व्यापार सुरक्षित होतो.

  • देशांतर्गत विमा क्षेत्राला चालना मिळते.

या पार्श्वभूमीवर ‘भारत मॅरिटाइम फंड’चा निर्णय भारताच्या सागरी व्यापाराला बळकटी देणारा आणि जागतिक अनिश्चिततेत सुरक्षितता प्रदान करणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

अदानींनी अंबानींना मागे टाकले; गौतम अदानी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

केंद्र सरकारचा निर्णय; ‘आधार' ॲपची सक्ती नाही, प्री-इन्स्टॉलचा प्रस्ताव रद्द

Dhule : 'कोणीतरी ओढत नेतंय'? १८ वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; CCTV मधील दृश्यांमुळे नागरिक हैराण

पवन खेडा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही; अटकपूर्व जामिनासाठी आसाम न्यायालयात जाण्याचे निर्देश

Nagpur : १८ बाटल्या फोडल्या; दारू नाकारताच तरुणांचा बारमध्ये धुडगूस, मॅनेजर रक्तबंबाळ, VIDEO व्हायरल