आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; मुंबईत कधी बरसणार?  
राष्ट्रीय

आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; मुंबईत कधी बरसणार?

केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे अधिकृत आगमन झाले असून आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mayuri Gawade

उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे गुरुवारी केरळमध्ये अधिकृत आगमन झाले आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याने आता मुंबईकरांसह राज्यातील सामान्य नागरिकांच्या अन् बळीराजाच्या नजरा त्याच्या पुढील प्रवासाकडे लागल्या आहेत.

मुंबईत मान्सून कधी दाखल होणार?

साधारणपणे मान्सून १ जूनच्या आसपास केरळमध्ये पोहोचतो. मात्र यंदा केरळमध्ये त्याचे आगमन सुमारे तीन दिवस उशिराने झाले आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर त्याची पुढील वाटचाल सामान्य राहिल्यास १४ जूनच्या सुमारास मुंबईत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राचे संचालक बिक्रम सिंग यांनी दिली.

साधारणपणे मुंबईत मान्सून दाखल होण्याची अधिकृत तारीख ११ जून असते. मात्र, १ जून रोजी केरळमध्ये मान्सून आल्यानंतर मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला सुमारे १० दिवसांचा काळ लागतो, त्यामुळे यंदा १४ जूनपर्यंत मान्सून मुंबईत धडकेल, असा अंदाज सिंग यांनी वर्तवला.

सध्या दक्षिण भारतात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील प्रतिकूल हवामान प्रणाली, तसेच केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीप बेटांवर सलग पाऊस न झाल्यामुळे मान्सूनची प्रगती काहीशी रखडली होती.

महाराष्ट्रात पुढील २ दिवसांत मान्सूनचे आगमन?

केरळमध्ये आगमन झाल्यानंतर आता ६ ते ७ तारखेला मान्सून तळकोकणात दाखल होण्याची शक्यताही काही रिपोर्ट्समध्ये वर्तवण्यात आली असून त्यानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागात पावसाला सुरुवात होऊ शकते. पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी पाऊस गोव्याच्या संपूर्ण भागात, महाराष्ट्राच्या काही भागांत तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाची शक्यता

दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात ७ जूनपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

मान्सून दाखल झाल्यानंतर केरळमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; जुळ्या बोगद्यांसाठी TBM यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात

'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ

Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू

पुणे विषारी दारू प्रकरणात नवी मुंबईतील बाप-लेक अटकेत; घातक रसायने पुरविल्याचे उघड, आतापर्यंत ३३३ जणांवर कारवाई

गारगाई धरणाच्या कामाचा शुभारंभ ऑक्टोबरमध्ये; २०२९ च्या पावसाळ्यात धरण तुडुंब भरणार; मुंबईला ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार