किचन बजेट बिघडणार! घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला; नवे दर आजपासून लागू 
राष्ट्रीय

किचन बजेट बिघडणार! घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला; नवे दर आजपासून लागू

घरगुती LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ जाहीर झाली असून सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा परिणाम होणार आहे. ७ मार्चपासून नवे दर लागू झाले असून घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर दोन्ही महागले आहेत. नेमके नवे दर काय आहेत आणि कोणत्या शहरात किती वाढ झाली आहे, जाणून घ्या…

Mayuri Gawade

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. शनिवार (दि. ७ मार्च) पासून देशभरात घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीचा परिणाम घरगुती ग्राहकांसोबतच हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि छोट्या व्यवसायांवरही होणार आहे.

महानगरांमधील घरगुती सिलिंडरचे नवे दर

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत १४.२ किलो घरगुती LPG सिलिंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपये झाली आहे. मुंबईमध्ये या सिलिंडरचा दर ८५२.५० रुपयांवरून ९१२.५० रुपये झाला आहे. कोलकातामध्ये घरगुती सिलिंडरची किंमत ८७९ रुपयांवरून ९३० रुपये झाली असून, चेन्नईमध्ये ती ८६८.५० रुपयांवरून ९२८.५० रुपये इतकी झाली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

व्यावसायिक सिलिंडरही महागले

हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यवसायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १९ किलो LPG सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. दिल्लीत या सिलिंडरचा दर १७६८.५० रुपयांवरून १८८३ रुपये झाला आहे.

मुंबईमध्ये हा दर १७२०.५० रुपयांवरून १८३५ रुपये झाला आहे. कोलकातामध्ये किंमत १८७५.५० रुपयांवरून १९९० रुपये झाली आहे, तर चेन्नईमध्ये १९२९ रुपयांवरून २०४३.५० रुपये इतकी वाढ झाली आहे.

एप्रिल २०२५ नंतरची पहिली दरवाढ

घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत एप्रिल २०२५ नंतर कोणताही बदल करण्यात आला नव्हता. त्यावेळी दिल्लीत अनुदान नसलेल्या सिलिंडरची किंमत ८५३ रुपये इतकी होती. आता झालेली ही दरवाढ घरगुती ग्राहकांसाठी तसेच LPG वर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

इंधन पुरवठ्याबाबत सरकारचा दिलासा

दरवाढीच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशात ऊर्जा टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे.

“नागरिकांना परवडणारे आणि शाश्वत इंधन उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. भारतात ऊर्जेची कोणतीही कमतरता नाही आणि ग्राहकांनी चिंता करण्याचे कारण नाही,” असे त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

इंधन टंचाईच्या अफवा फेटाळल्या

दरम्यान, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या सोशल मीडियावरील अफवा फेटाळल्या आहेत.

कंपनीच्या निवेदनानुसार, देशात पुरेसा इंधन साठा उपलब्ध असून पुरवठा आणि वितरण व्यवस्था सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये आणि अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जागतिक परिस्थितीवर सरकारची नजर

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारताकडे कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने आणि LPG यांचा पुरेसा साठा आहे.

गेल्या काही वर्षांत भारताने कच्च्या तेलाच्या आयात स्रोतांचे मोठ्या प्रमाणावर विविधता केले आहे. त्यामुळे जागतिक पुरवठ्यात अडथळे आले तरी देशावर त्याचा मोठा परिणाम होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीत वाढ

२०२२ पासून भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरू केली आहे. २०२२ मध्ये भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीत रशियाचा वाटा केवळ ०.२ टक्के होता. मात्र त्यानंतरच्या काळात हा वाटा लक्षणीय वाढला आहे.

फेब्रुवारी महिन्यात भारताने आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे २० टक्के तेल रशियाकडून आयात केले. हे प्रमाण दररोज सुमारे १.०४ दशलक्ष बॅरल इतके असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

LPG उपलब्धतेसाठी पावले

जानेवारीपासून अमेरिकेकडून भारतात LPG चा पुरवठा सुरू झाला आहे. भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये अमेरिकेच्या गल्फ कोस्टमधून दरवर्षी सुमारे २.२ MTPA LPG आयात करण्यासाठी एक वर्षाचा करार केला आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक

T20 Final साठी रेल्वेची खास सोय; मुंबई-पुण्याहून अहमदाबादसाठी स्पेशल ट्रेन, वाचा वेळापत्रक

समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाची भारतीय कंपन्यांकडून खरेदी; अमेरिकेकडून महिन्याभराची सवलत मिळाल्याचा परिणाम

ठाणेकरांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर ३१ मार्चपर्यंत वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?

कर्नाटकात मुलांना सोशल मीडिया वापरास बंदी; आता १६ वर्षांखालील मुलांना इंटरनेट वापरणे होणार अवघड