कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील कालीघाट निवासस्थानी शुक्रवारी पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या अवघ्या ८ आमदारांनी आणि ६ खासदारांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मात्र, ही बैठक सर्व खासदार किंवा आमदारांची नसून केवळ 'राष्ट्रीय कार्यकारिणीची' बैठक होती, त्यामुळे सर्वांना आमंत्रित करण्यात आले नव्हते, असे ममता यांच्यातर्फे सांगण्यात आले.
गेल्या दोन दिवसांत ममता यांनी अनेक बंडखोर आमदारांशी फोनवरून थेट संवाद साधला आहे. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. तृणमूलमधून हकालपट्टी झालेल्या ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर छावणीच्या बैठकीत हे आमदार सहभागी झाले आहेत.
हा संपूर्ण वाद ममता यांचे पुतणे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात असल्याचे बंडखोरांचे म्हणणे आहे. मात्र, अभिषेक बॅनर्जींना विरोध करताना ममता यांनाच आपले मुख्य मार्गदर्शक आणि वैचारिक प्रतीक मानण्याचा पवित्रा बंडखोरांनी घेतला आहे. याच विसंगतीमुळे आता बंडखोर छावणीत अंतर्गत मतभेद आणि अस्वस्थता समोर येऊ लागली आहे. यावरून बंडखोरांची कोंडी स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, ऋतब्रत बॅनर्जी यांच्या छावणीने आपली पकड मजबूत करणे सुरूच ठेवले आहे. विरोधी पक्षनेतेपदाची मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी ५८ आमदारांसह बैठक घेतली आणि बंडखोर कार्यकर्त्यांना पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारीसाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली.