इम्फाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्यानंतर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. शांतता असेल तर विकास वेगाने होतो, आम्ही मणिपूरसोबत आहोत, असे आवाहन मोदी यांनी आपल्या मणिपूर दौऱ्यात केले. मात्र त्यांची पाठ फिरताच रविवारी रात्री उशिरा चुराचांदपूरमधील कुकी नेत्यांची घरे जाळण्यात आली. मणिपूरमध्ये या भागात तणाव असून रात्री पुन्हा हिंसाचार सुरू झाला.
‘कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन’चे नेता केल्व्हीन एकेथांग यांचे घर रविवारी रात्री उशिरा जाळण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, तर स्थानिकांनी कोणी हल्ला केला नाही तर हे घर शॉर्टसर्किटमुळे जळाल्याचे सांगितले. यावरून संभ्रम असताना आणखी एक कुकी नेता गिन्झा वुआलजोंग यांच्या घरालाही लक्ष्य करण्यात आले. स्थानिक आणि सुरक्षा दल वेळेवर पोहोचल्यामुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली.
केएनओ आणि युनायटेड पीपल्स फ्रंट (यूपीएफ) या दोन प्रमुख कुकी-जो संघटनांनी ४ सप्टेंबरला केंद्र सरकारसोबत ऑपरेशन्स सस्पेंशन करारावर पुन्हा स्वाक्षरी केली होती. मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखणे, संवेदनशील भागातून संघटनेच्या नियुक्त छावण्या काढून टाकणे आणि राज्यात कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरतेसाठी उपाय शोधण्यासाठी काम करणे अशा अटी होत्या. यावर काम होईल, मणिपूर शांत होईल, असे अधिकाऱ्यांना वाटले होते.
राष्ट्रीय महामार्ग-२ सामान्य लोकांच्या आणि आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो, असे कुकी संघटनांनी संकेत दिले होते. परंतु, नंतर राष्ट्रीय महामार्ग-२ उघडण्याची घोषणा केलेली नाही, असे स्पष्ट केले. यावरून पुन्हा राज्यात गोंधळ सुरू झाला होता. कांगपोक्पी जिल्ह्यातील लोकांना सुरक्षा दलांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. केंद्राने चुकीचा अर्थ काढल्याचे ‘केझेडसी’ने म्हटले आहे.