...तर पाकला पुन्हा धडा शिकवावा लागेल! सरसंघचालक मोहन भागवत यांचा इशारा एएनआय
राष्ट्रीय

...तर पाकला पुन्हा धडा शिकवावा लागेल! सरसंघचालक मोहन भागवत यांचा इशारा

भारताला नेहमी पाकिस्तानसोबत शांततेत राहायचे आहे, पण पाकिस्तानलाच शांतता नको आहे. पाकने आपला स्वभाव बदलला नाही तर त्याला पुन्हा धडा शिकवावा लागेल, असा इशारा सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला.

Swapnil S

बंगळुरू : भारताला नेहमी पाकिस्तानसोबत शांततेत राहायचे आहे, पण पाकिस्तानलाच शांतता नको आहे. पाकने आपला स्वभाव बदलला नाही तर त्याला पुन्हा धडा शिकवावा लागेल, असा इशारा सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला.

येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत संस्था नसल्याबद्दल टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर अप्रत्यक्ष प्रहार करत संघप्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी स्पष्ट केले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही ‘व्यक्तींची संस्था’ म्हणून अधिकृतपणे ओळखली जाते.

संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली. तुम्हाला काय वाटते, आम्ही ब्रिटिश सरकारकडे नोंदणी करायला हवी होती का?” असा सवाल भागवत यांनी आरएसएस आयोजित एका अंतर्गत संवाद कार्यक्रमात विचारला.

त्यांनी सांगितले की स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने संस्थांची नोंदणी सक्तीची केलेली नाही.

‘आम्ही व्यक्तींचा समूह म्हणून वर्गीकृत आहोत आणि आम्ही मान्यताप्राप्त संस्था आहोत. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्राप्तिकर विभाग आणि न्यायालयांनीही त्यांना व्यक्तींची संस्था मानले असून संघाला करमुक्ती दिली आहे, असे त्यांनी नमूद केले.

हिंदू धर्माचीही नोंदणी नाही!

आमच्यावर तीनदा बंदी घातली गेली आहे. म्हणजे सरकारने आमचे अस्तित्व मान्य केले आहे. आम्ही अस्तित्वातच नसतो, तर सरकारने कोणावर बंदी घातली असती? खूप गोष्टी नोंदणीकृत नसतात. हिंदू धर्माचीही नोंदणी नाही,’ असे ते म्हणाले.

संघ फक्त भगव्या ध्वजाला मान देतो आणि तिरंग्याला मान्यता देत नाही, या प्रश्नावर भागवत म्हणाले की, “संघात भगवा ध्वज हा गुरु मानला जातो, परंतु आम्ही भारतीय तिरंग्याला अत्यंत आदर देतो. आम्ही नेहमी तिरंग्याचा सन्मान करतो, त्याला अभिवादन करतो आणि त्याचे रक्षण करतो,” असे संघप्रमुख म्हणाले.

अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या उदाहरणाचा उल्लेख करत भागवत म्हणाले की, ‘संघ स्वयंसेवकांनी मंदिर आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यावेळी भाजपही होती. जर काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने पाठिंबा दिला असता, तर आम्ही त्यांनाही समर्थन दिले असते.’ आमचा कोणत्याही पक्षाशी विशेष संबंध नाही. संघाचा स्वतःचा पक्ष नाही. आमचा कोणताही पक्ष नाही आणि सर्व पक्ष आमचेच आहेत, कारण ते सगळे भारतीय पक्ष आहेत,’ असे त्यांनी नमूद केले.

समाजातील जातिवादाविषयी बोलताना भागवत म्हणाले, ‘जातव्यवस्था नाही, पण जातींचा गोंधळ आहे. सवलतींसाठी आणि निवडणुकांसाठी हा गोंधळ आहे. त्यामुळे जात नष्ट करण्यासाठी नव्हे, विसरण्यासाठी प्रयत्न हवा आणि तो प्रत्येक जण वैयक्तिकरित्या करू शकतो.’

‘लव्ह जिहाद’विषयी विचारल्यावर भागवत म्हणाले, ‘इतर काय करतात याचा विचार न करता आपण काय करायला हवे यावर विचार करा. घराघरात हिंदू संस्कार रुजवा,’ असे आवाहन त्यांनी केले.

कोणत्याही पक्षाला आमचे समर्थन नाही

भागवत यांनी स्पष्ट केले की, संघ कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन देत नाही. आम्ही मतदानाच्या, वर्तमान राजकारणाच्या, निवडणुकीच्या राजकारणाच्या बाहेर आहोत. संघाचे कार्य समाजाला एकत्र आणणे हे आहे, आणि राजकारण हे विभाजनात्मक असते, म्हणून आम्ही त्यात सहभागी होत नाही.’

‘आम्ही व्यक्ती किंवा पक्ष नव्हे, तर धोरणांना समर्थन देतो. योग्य धोरणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आमची ताकद लावतो,’ असे भागवत म्हणाले.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये