कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर एका सरकारी कार्यक्रमाला उपस्थित राहात ४२० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या अनेक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांचा एकूण अंदाजे खर्च अंदाजे १८,८६० कोटी रुपये आहे. याशिवाय, नरेंद्र मोदींनी इतर अनेक विकास प्रकल्पांचंही उद्घाटन केले. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अधिकृत कार्यक्रमापासून दूर राहिल्या.
मोदी म्हणाले की, देशाच्या इतर भागांप्रमाणेच बंगालमध्ये रेल्वेच्या विकासाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. बंगालची जलमार्गाद्वारे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स तसेच कोलकाता डॉकचे नूतनीकरण केले जात आहे. यामुळे पूर्व भारतातील संपूर्ण लॉजिस्टिक्स सिस्टम (मालवाहतूक हाताळणी प्रणाली) सुधारेल, असे मोदी म्हणाले.
सरकार बदलण्याचे आवाहन
मोदी यांनी जाहीर सभेत उपस्थित असलेल्या जनतेला संबोधित करताना पश्चिम बंगालमध्ये सरकार बदलण्याचे आवाहन केले. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारला "एक निर्दयी सरकार" आणि "महा जंगलराज" असे संबोधले. तृणमूल काँग्रेस संपुष्टात येईल आणि कोणीही पक्षाला वाचवू शकणार नाही, असा दावाही मोदींनी केला.
लोकांना रोखण्याचा प्रयत्न
तुम्ही जेथे पाहाल तेथे सगळीकडे लोक आहेत, असा उल्लेख सभेतील प्रचंड गर्दी पाहून मोदींनी केला. टीएमसीने लोकांना सभेला येण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. रस्ते अडवले, पोस्टर्स फाडले, लोकांना धमकावले पण यामुळे लोक थांबले नाहीत. ही प्रचंड गर्दी म्हणजे या सरकारच्या जाण्याची उलटी गिनती सुरू झाल्याचा पुरावा आहे, असेही ते म्हणाले.
तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
दरम्यान, शनिवारी मध्य कोलकात्यातील गिरीश पार्कजवळ तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजपा समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात एक पोलीस कर्मचारी आणि भाजपचा एक नेता जखमी झाला. मोदी यांच्या सभेपूर्वी ही हाणामारी झाली. पंतप्रधानांच्या समर्थनार्थ घोषणा देत ते सभेच्या ठिकाणी जात जात असताना, काही भागातून अचानक त्यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपा समर्थकांनी केला आहे. मात्र. स्थानिक टीएमसी कार्यकर्त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि दावा केला की, भाजपा समर्थकांनीच प्रथम त्यांना शिवीगाळ करण्यास आणि त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच स्थानिक टीएमसी नेत्यांच्या घरांवरही दगडफेक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.