नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) राजीव कुमार येत्या १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे लवकरच नवीन व्यक्तीची या पदावर निवड होणार आहे. यासाठी कायदे मंत्रालयाने १७ फेब्रुवारी रोजी तीन सदस्यीय समितीची बैठक बोलावली आहे. निवड समितीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन मेघवाल आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.
राजीव कुमार यांची मे २०२२ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या. याशिवाय एका दशकाहून अधिक काळानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, अटी आणि कार्यकाळ) कायदा, २०२३ च्या तरतुदी सीईसीच्या नियुक्तीसाठी प्रथमच लागू केल्या जात आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि दिल्लीत विधानसभा निवडणुका झाल्या, तर २०२३ मध्ये राजीव कुमार यांच्या देखरेखीखाली कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणुका झाल्या होत्या. जानेवारी २०२५ मध्ये दिल्ली निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना राजीव कुमार यांनी त्यांच्या निवृत्ती योजनेबद्दल सांगितले होते. निवृत्तीनंतर चार-पाच महिने हिमालयात जाऊन एकांतात ध्यान करणार असल्याचेही ते म्हणाले