नवी दिल्ली : ‘एनसीईआरटी’च्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराबाबतच्या असलेल्या मजकुरावर सरन्यायाधीश सूर्य कान्त यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, मी कोणालाही संस्थेची बदनामी करू देणार नाही, हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळायचे ते आपल्याला माहिती आहे, हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला आहे, असे स्पष्ट करीत त्याची गंभीर दखल त्यांनी घेतली.
राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) आठवीच्या समाजशास्त्र पुस्तकात 'न्यायव्यवस्थेमधील भ्रष्टाचार' आणि 'अधिक काळ सुरू असलेले प्रलंबित खटले' या विषयावर धडे आहेत. पुस्तकाच्या संपादित आवृत्तीत हा सर्वात मोठा बदल आहे. त्यात न्यायव्यवस्थेची रचना आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
बुधवारी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी सरन्यायाधीशांकडे ‘एनसीईआरटी’मधील धड्याचा मुद्दा उपस्थित केला. सिब्बल म्हणाले की, आठवीच्या विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्था भ्रष्ट असल्याचे शिकविले जात आहे. हे मनाला अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. सरन्यायाधीशांनी सांगितले की, त्यांना या प्रकरणाची जाणीव आहे. मी कोणालाही संस्थेची बदनामी करू देणार नाही. मला ते कसे हाताळायचे हे माहित आहे, असे सूर्य कान्त म्हणाले.