नवी दिल्ली : येत्या २१ जून रोजी होणारी ‘नीट-यूजी’ पुनर्रचना परीक्षा पूर्णपणे सुरक्षित आणि त्रुटीमुक्त पद्धतीने पार पाडण्यासाठी केंद्र सरकार एका मोठ्या पर्यायावर विचार करत आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी चक्क भारतीय हवाई दलाची मदत घेण्याबाबत सरकार चाचपणी करत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी गुरुवारी दिली.
हा पर्याय अंतिम मंजुरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला जाईल आणि त्यानंतरच यावर शिक्कामोर्तब होईल. २१ जून रोजी होणाऱ्या या पुनर्रचना परीक्षेच्या तयारीवर पंतप्रधान स्वतः बारीक लक्ष ठेवून असून, परीक्षेच्या प्रत्येक प्रक्रियेची माहिती त्यांना दिली जात असल्याचे समजते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या पर्यायावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उच्चस्तरीय बैठकीत चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नीट-युजी'च्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक हवाई दलाच्या विमानांद्वारे करता येईल का, यावर या मंत्र्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारविनिमय केला. मात्र, अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.