श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात कथित ‘गोभक्षकां’नी पाठलाग केल्यामुळे एका व्यक्तीने नदीत उडी मारून जीव गमावल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी तीव्र प्रतिक्रिया दिली. केंद्रशासित प्रदेशात आपण कोणत्याही परिस्थितीत ‘जंगलराज’ चालू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा शहरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, ‘कोणालाही शांतता भंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सरकारचा उद्देश जम्मू-काश्मीरमध्ये एका नवीन पर्वाची सुरुवात करणे आणि परिस्थिती स्थिर ठेवणे हा आहे.’
रामबन जिल्ह्यात जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीचा चार जणांनी पाठलाग करून त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्लेखोरांपासून वाचण्यासाठी संबंधित व्यक्तीने नदीत उडी मारली, त्यानंतर तो बेपत्ता झाला आहे. या घटनेच्या चौकशीसाठी आता विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
या प्रकरणातील दोषींवर आणि कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत असा खंबीर संदेश जाईल, अशी विनंती अब्दुल्ला यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांना केली.
तन्वीर अहमद चोपान (रा. पोगल) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे.रविवारी दुपारी दीडच्या सुमारास मकेरकोट टनेल क्रमांक ५ जवळ बिस्लेरी नाल्यात तन्वीरने उडी मारली आणि तो वाहून गेला.
या घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी सोमवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (NH-44) तीन तास रोखून धरला होता. रामसू पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे जिल्हा दंडाधिकारी मोहम्मद इलियास खान यांनी स्पष्ट केले की, संबंधित तरुणाकडे जनावरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर परवानगी होती.