पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशभर रोजगार योजनेची घोषणा केली. याचा पहिला टप्पा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नियुक्तीपत्रांचे वाटपदेखील करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी भविष्यात महाराष्ट्रामध्ये तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले असल्याची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले की, "केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी तब्बल २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर करण्याचा निर्णय घेतला. यापैकी काही प्रकल्पांवर काम सुरु आहे तर काही प्रकल्प लवकरच सुरु होतील. तसेच, राज्यात रेल्वेसाठी ७५ हजार कोटी तर रस्ते विकास प्रकल्पांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्यामध्ये जर एवढी मोठी रक्कम पायाभूत सुविधांवर खर्च होत असेल, तर त्यामधून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतील."