मुंबई : जागतिक क्रमवारीत उच्च शिक्षणाच्या स्पर्धेत भारतीय संस्थांना यंदा स्थान मिळाले आहे. ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स बाय सब्जेक्ट’मध्ये भारतातील सहा प्रमुख संस्थांना विषयानुरूप क्रमवारीत जगातील पहिल्या ५० संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे. क्यूएस रँकिंगमध्ये चार भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी (बिट्स पिलानी) यांचा समावेश आहे.
लंडनस्थित क्यूएस क्वाकरेल्ली सायमंड्स ही संस्था दरवर्षी जगभरातील उच्चशिक्षण संस्थांचे गुणांकन आणि मूल्यांकन करते. या संस्थेने जाहीर केलेल्या या क्रमवारीत जगभरातील १०० हून अधिक देशांतील सुमारे १९०० विद्यापीठांमधील २१ हजारांहून अधिक अभ्यासक्रमांचे मूल्यमापन करण्यात आले. ५५ विषय आणि पाच व्यापक शैक्षणिक क्षेत्रांमध्ये ही क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे.
यंदाच्या क्रमवारीत भारताने विविध विषयांमध्ये तब्बल २७ वेळा पहिल्या ५० मध्ये स्थान मिळवले आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या १२ च्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढली आहे. विशेष म्हणजे, ही कामगिरी देशातील १२ संस्थांनी केली आहे.
या यादीत आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी खरगपूर आणि आयआयटी मद्रास या आयआयटींचा समावेश आहे. यामुळे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची ताकद अधोरेखित झाली आहे. आयआयटी दिल्ली आणि मुंबई यांनी सहा विषयांमध्ये पहिल्या ५० मध्ये स्थान मिळवले आहे. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पहिल्यांदाच टॉप ५० मध्ये प्रवेश, तसेच इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि अभियांत्रिकी-तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय स्थान मिळवत आयआयटी दिल्लीने वेगळी छाप पाडली आहे.
व्यवस्थापन शिक्षणात आयआयएम अहमदाबादने बिझनेस अँड मॅनेजमेंट स्टडीज आणि मार्केटिंग या दोन्ही विषयांत २१वे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, मार्केटिंग विषयात भारताने प्रथमच जागतिक क्रमवारीत स्थान मिळवले आहे. तसेच इंडियन स्कूल ऑफ माईन्स धनबाद (आयएसएम धनबाद) या संस्थेने खनिजे व खनिकर्म अभियांत्रिकीमध्ये २१वे स्थान मिळवले आहे.