नवी दिल्ली : निवडणूक आयोग मते चोरत आहे. आमच्याकडे अणुबॉम्ब आहे. जेव्हा त्याचा स्फोट होईल तेव्हा निवडणूक आयोग वाचणार नाही. निवडणूक आयोगात मते चोरणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. तुम्ही भारताविरुद्ध काम करत आहात, तुम्ही निवृत्त झाल्यानंतरही आम्ही तुम्हाला शोधून काढू, असा इशारा काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला. संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
यापूर्वी २४ जुलै रोजी राहुल गांधी म्हणाले होते की, मी निवडणूक आयोगाला एक संदेश देऊ इच्छितो, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यातून सुटाल, जर तुमच्या अधिकाऱ्यांना वाटत असेल की ते सुटतील, तर हा तुमचा गैरसमज आहे. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही.
पुनरीक्षणाची आकडेवारी
निवडणूक आयोगाच्या बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यानुसार, एकूण मतदारांची संख्या ७.२४ कोटींवर आली आहे, पूर्वी ही संख्या ७.८९ कोटी होती. म्हणजेच सुमारे ६५ लाख मतदारांना यादीतून वगळण्यात आले आहे.
निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करा - आयोग
निवडणूक आयोग अशा निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करतो. सततच्या धमक्या असूनही, आम्ही सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्यास सांगू इच्छितो. बेजबाबदार विधानांकडे दुर्लक्ष करा, असे निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना सांगितले.
मतदार यादीचा नवीन मसुदा जाहीर
राहुल गांधींसह सर्व विरोधी पक्षांनी बिहार मतदार पडताळणीबाबत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. संसदेच्या आत आणि बाहेर विरोधी पक्ष याबाबत निषेध करत आहेत. या पार्श्वभूमीवर बिहारमधील निवडणूक आयोगाने शुक्रवारी राजकीय पक्षांना मतदार यादीचा नवीन मसुदा जारी केला आहे.