नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील घोटाळा आणि मतदारयादीच्या पडताळणीवरून पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी असल्याचे राहुल गांधी यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाच्याच संकेतस्थळावरून डेटा घेत त्यात असलेल्या त्रुटी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून मांडल्या. यानंतर इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर मोर्चाही काढला. मतदार यादीत घोटाळा आणि मतदार यादीच्या पडताळणीवरून त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.
राहुल गांधी ज्या ५० विधानसभा जागांना भेट देणार आहेत त्यापैकी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने २३ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने ५० पैकी २० जागा लढवल्या, त्यापैकी ८ जागा जिंकल्या. त्याचवेळी, लोकसभा निवडणुकीपूर्वी, जानेवारी २०२४ मध्ये, राहुल गांधी यांनी बिहारमध्ये ५ दिवसांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सासाराम, औरंगाबाद, पूर्णिया, कटिहार आणि किशनगंज या ५ जागा इंडिया आघाडीच्या खात्यात गेल्या. येथे ३० विधानसभा जागा आहेत, जिथे काँग्रेस अधिक लक्ष केंद्रित करू शकते.
आता पुरावे आहेत
राहुल गांधी म्हणाले की, संविधानात लिहिले आहे की ‘एक व्यक्ती, एक मत’. निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे की, संविधान त्यांनी लागू करावे. आम्ही थांबणार नाही. आम्ही संविधानाचे संरक्षण करत आहोत. ही फक्त एका मतदारसंघापुरती गोष्ट नाही. खूप मतदारसंघ आहेत. राष्ट्रीय पातळीवर हे केले जात आहे आणि अगदी नियोजनपूर्वक केले जात आहे. निवडणूक आयोगालाही आणि आपल्यालाही माहिती आहे, आधी आमच्याकडे पुरावे नव्हते, पण आता आमच्याकडे पुरावे आहेत.
बिहारमध्ये राहुल यांची यात्रा
राहुल गांधी यांची बिहारमधील आतापर्यंतची सर्वात मोठी यात्रा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मतदार पडताळणी आणि निवडणुकीत मतचोरीच्या आरोपांवर आधारित काँग्रेस नेत्याची ‘मतदान अधिकार यात्रा’ २३ जिल्ह्यांमधून जाईल, ज्यामध्ये ५० विधानसभा जागा समाविष्ट असतील. विधानसभा निवडणुकीपूर्वी, शहादाबाद ते मगध, अंग, कोसी, सीमांचल, मिथिला, तिरहुत आणि सारण असा दौरा करून इंडिया आघाडीच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.