नवी दिल्ली/भुज : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी विजयादशमीनिमित्त पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावले आहे. भारतीय नियंत्रणरेषेवर सीमा सुरक्षा दलासह लष्कर तैनात आहे. जर सिर क्रीक भागात पाकिस्तानच्या कुरापती सुरूच राहिल्या तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकू, असा इशारा त्यांनी दिला. इतकेच नव्हे तर कराचीचा मार्ग हा सिर क्रीकमधूनच जातो याची आठवणही संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला करून दिली.
विजयादशमीनिमित्त गुजरातच्या कच्छ येथे शस्त्र पूजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी भारतीय लष्कराला संबोधित केले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या लेहपासून ते सिर क्रीकपर्यंत पाकिस्तानने भारताचे संरक्षण कवच भेदण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्याला भारताच्या लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिमचा फज्जा उडवला. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणे नेस्तनाबूत केली याची आठवण यावेळी संरक्षण मंत्र्यांनी करून दिली. स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत.