नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले असले तरी त्यांच्या विमान अपघताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी तर हा प्रश्न सातत्याने उचलून धरला असून या अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित करून सोबत काही पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार यांनी शनिवारी दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली. तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
व्हिएसआर कंपनीवर बंदी घालण्याची मागणी
मुंबईतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी ब्लॅक बॉक्स आणि इतर तांत्रिक त्रुटी माध्यमांसमोर मांडल्या. यावेळी त्यांनी डीजीसीएतील अनेक अधिकाऱ्यांच्या तपासावरही आक्षेप घेतला. तसेच, व्हिएसआर कंपनीवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी केंद्रातील मोठ्या नेत्याची व्हिएसआर कंपनीच्या मालकाला साथ असल्याचा आरोप केला होता. तसेच, या प्रकरणामागे अत्यंत प्रभावशाली लोकांचा सहभाग असल्याचेही रोहित पवार म्हणाले.
प्रभावशाली लोकांनी यात लक्ष घालावे...
व्हिएसआरला कोणी वाचवत असेल तर तोही एक षडयंत्राचा भाग असू शकतो. डीजीसीएचे मोठे अधिकारी यामागे आहेत, तर मला वाटतं की अजित पवारांना न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्र आणि देशातील अनेक लोक प्रयत्न करत आहेत, पण या तपासात न्याय देण्याची गरज असेल तर या देशातील प्रभावशाली लोकांनी यात लक्ष घातलं पाहिजे. कारण, तेच याप्रकरणी न्याय देऊ शकतात. कारण, या प्रकरणातील लोकही प्रभावशाली आहेत. भारताचे सर्वांत मोठे प्रभावशाली नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच त्यांना न्याय देऊ शकतील. त्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालावे. मी नरेंद्र मोदींना याविषयी इमेलद्वारे पत्र लिहिणार आहे, असे रोहित पवार म्हणाले. दरम्यान, रोहित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून याप्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.