राष्ट्रीय

महाराष्ट्राच्या सुवर्णपदकांचा रौप्यमहोत्सव! सलग तिसऱ्या दिवशी पदकांची लयलूट; जिम्नॅस्टिक्स, सायकलिंग, मल्लखांबमध्ये सोनेरी यश, एकूण पदकसंख्या ७२वर

पुण्याची बॉक्सिंगपटू देविका घोरपडे, जिम्नॅस्टिक्समध्ये आर्यन दवंडे, शताक्षी टक्के, सायकलिंगमध्ये पुण्याचा वेदांत जाधव, मल्लखांबमध्ये शार्दूल ऋषिकेश, मृगांक पाथरे या सर्वांनी सुवर्णपदकावर नाव कोरले.

Swapnil S

चेन्नई : गतविजेत्या महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील सहाव्या पर्वात सलग तिसऱ्या दिवशी पदकांची लयलूट केली. पुण्याची बॉक्सिंगपटू देविका घोरपडे, जिम्नॅस्टिक्समध्ये आर्यन दवंडे, शताक्षी टक्के, सायकलिंगमध्ये पुण्याचा वेदांत जाधव, मल्लखांबमध्ये शार्दूल ऋषिकेश, मृगांक पाथरे या सर्वांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यामुळे महाराष्ट्राने सुवर्णपदकांचा रौप्यपहोत्सव साजरा करताना पदकतालिकेतील अग्रस्थान अधिक भक्कम केले.

मुलींच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या सियाने १२.१० सेकंद वेळ नोंदवून सुवर्ण पटकावले. ऋतुजा भोसलेने १२.२३ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले. सिया ही मुंबईकर असून राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्येही तिने दोन सुवर्णपदके कमावली होती. तर पुण्याच्या ऋतुजाने पहिल्याच खेलो इंडिया स्पर्धेत छाप पाडली.

मल्लखांबमध्ये शार्दूलने वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद मिळवण्यासह टांगत्या मल्लखांब प्रकारात सुवर्णपदक मिळवले. तसेच दोरीच्या मल्लखांबमध्ये त्याने रौप्यपदक प्राप्त केले. बॉक्सिंगमध्ये देविकाने हरयाणाच्या निधीला ५२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धूळ चारली. देविकाचे हे चौथे पदक ठरले. मुलांच्या ६३ किलो गटात अकोल्याच्या गौरव चव्हाणने रौप्यपदकाला गवसणी घातली.

जिम्नॅस्टिक्समध्ये शताक्षी टक्केने मुलींच्या फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात सुवर्णपदक कमावले. शताक्षी व तेलंगणाची निशिका अगरवाल दोघींचे समान ११,५०० गुण होते. मात्र सादरीकरणातील अचुकता व कलात्मकतेच्या बळावर शताक्षीने बाजी मारली. त्याशिवाय आर्यन दवंडेने मुलांच्या व्हॉल्ट टेबल व समांतर बार प्रकारात सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

Mumbai : धरणांतील पाणीसाठा घटला; BMC चे नवे नियम जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

आता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तरच मिळेल कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

सौरव गांगुलींकडून फेसबुक पेजविरोधात तक्रार दाखल; खोटी माहिती पसरवल्याचा आरोप